पंतप्रधान मोदींना राहुल गांधींची साथ, लोकसभेत नेमकं काय घडलं?

लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एकत्र येत ओम बिरला यांना अध्यक्षपदाच्या खुर्चीपर्यंत घेवून गेले. ही एक संसदेची परंपरा आहे.

Advertisement
Read Time: 3 mins
नवी दिल्ली:

ओम बिरला हे 18 व्या लोकसभेचे अध्यक्ष म्हणून निवडले गेले. आवाजी मतदानाने बिरला यांची निवड झाली. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ओम बिरला यांचे अभिनंदन केले. त्यानंतर लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एकत्र येत ओम बिरला यांना अध्यक्षपदाच्या खुर्चीपर्यंत घेवून गेले. ही एक संसदेची परंपरा आहे. लोकसभेचा अध्यक्ष हा निष्पक्ष असतो. त्याला सत्ताधाऱ्यां बरोबरच विरोधी पक्षाचे हित ही सांभाळावे लागते. त्यामुळेच सभागृहाचा नेता आणि विरोधी पक्षाचा नेता त्यांच्याच्या खुर्चीपर्यंत एकत्रीत घेवून जातात. त्यानंतर त्यांना शुभेच्छा दिल्या जातात. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा ) 

लोकसभेच्या अध्यक्षाची निवड बिनविरोध व्हावी यासाठी प्रयत्न केले गेले. पण त्यात यश आले नाही. विरोधी पक्षाने लोकसभेच्या उपाध्यक्ष पदावर दावा केला. मात्र सरकारने याबाबत कोणतेही आश्वासन विरोधी पक्षाला दिले नाही. त्यानंतर अध्यक्षपदाच्या निवडणुकीत विरोधी पक्षानेही आपला उमेदवार रिंगणात उतरवला. मात्र या निवडणुकीसाठी मतदान घेतले गेले नाही. आवाजी मतदानाने हा प्रस्ताव मंजूर करण्यात आला. त्यानंतर ओम बिरला यांची अध्यक्ष म्हणून घोषणा करण्यात आली. 
 

पंतप्रधान मोदींनी दिल्या शुभेच्छा 

यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ओम बिरला यांचे अभिनंदन करत त्यांना शुभेच्छा दिल्या. सलग दुसऱ्यां वेळी अध्यक्ष होण्याचा मान मिळत आहे ही मोठी गोष्ट असल्याचेही यावेळी मोदी म्हणाले. हे एक रेकॉर्ड असेल असेही त्यांनी सांगितले. बलराम जाखड हे एकमेव खासदार आहेत जे सलग दोन वेळा लोकसभेचे अध्यक्ष झाले होते अशी आठवण त्यांनी सांगितली. अध्यक्ष पदाची जबदारी ही मोठी आणि आव्हानात्मक आहे. तुम्हाला पहिल्या पाच वर्षाचा अनुभव आहे. त्याचा फायदा यावेळी नक्की होईल असेही ते म्हणाले.यावेळी मोदींनी ओम बिरला यांच्या हसतमुख चेहऱ्याचे कौतूक केले. तुमच्या या हस्याने सभागृहातही सर्वांच्या चेहऱ्यावर हस्य उमटेल असे  सांगत त्यांनी बिरला यांना शुभेच्छा दिल्या. 

ट्रेंडिंग बातमी - आतापर्यंत एकही निवडणूक हरले नाही, कोण आहेत ओम बिर्ला ज्यांनी रचला इतिहास

राहुल गांधींनी काय म्हणाले? 

पंतप्रधान नरेंद्र मोदींनंतर राहुल गांधी यांनी ओम बिरला यांचे अभिनंदन केले. या सभागृहात देशाचा आवाज आहे. तुम्हाला सभागृह चालवताना विरोधकांचे सहकार्य नक्कीच राहील. मात्र आमचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करू नका. विरोधकांनाही बोलण्याची संधी द्या असे राहुल गांधी म्हणाले. या लोकसभा निवडणुकीचे निकाल हे अनेक गोष्टी शिकवणारे आहेत. देशाच्या संविधानाची जपवणूक करण्याची जबाबदारी तुमची आहे असे सांगत बिरला यांचे राहुल गांधी यांनी अभिनंदन केले.  

Advertisement

याआधी कधी झाली लोकसभा अध्यक्षाची निवडणूक? 

देशाच्या इतिहासात आतापर्यंत तीन वेळा लोकसभा अध्यक्षाची निवडणूक झाली आहे. 1952, 1967 आणि 1976 मध्ये लोकसभा अध्यक्षपदाची निवडणूक झाली होती. 1952 साली जी. वी. मावळकर हे पहिले लोकसभेचे अध्यक्ष झाले होते. त्यांच्या विरोधात शांताराम मोरे यांनी निवडणूक लढवली होती. मावळकर यांना 394 मते मिळाली होती. तर मोरे यांना  केवळ 55 मते मिळाली होती. 1967 साली विश्वनाथम यांनी काँग्रेस उमेदवार नीलम संजीव रेड्डी यांच्या विरोधात अध्यक्षपदाची निवडणूक लढवली होती. रेड्डी यांना 278 मते मिळाली होती. तर विश्वनाथम यांना 207 मते मिळाली. 

आणीबाणी वेळीही झाली निवडणूक 

त्यानंतर पाचव्या लोकसभेतही 1975 साली तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी आणीबाणी जाहीर केली होती. शिवाय लोकसभेचा कार्यकाळ एक वर्षाने वाढवला होता. त्यावेळी तत्कालीन लोकसभा अध्यक्ष जी.एस. ढिल्लो यांनी राजीनामा दिला होता. त्यानंतर बळीराम भगत यांना लोकसभेचे अध्यक्ष म्हणून निवडले गेले होते. त्यांच्या विरोधात जनसंघाचे नेते जगन्नाथराव जोशी हे निवडणूक लढले होते. जोशी यांना केवळ 58 मते मिळाली होती. तर भगत यांना 344 मते मिळाली होती. 

Advertisement

Topics mentioned in this article