MNS News : 'मी राज ठाकरेंची भक्ती केली, व्यापार नाही' कोकणातील मनसेच्या बड्या नेत्याची खदखद उघड!

जाहिरात
Read Time: 3 mins
Raj Thackeray : मी राज ठाकरे यांची भक्ती केली, इतरांसारखे त्यांचे नाव वापरून व्यापार नाही केला अशी पोस्ट खेडेकर यांनी केली आहे.
रत्नागिरी:

राकेश गुडेकर, प्रतिनिधी

MNS News :  कोकणात मनसेतील अंतर्गत खदखद आता सोशल मीडियावर आली आहे. मनसेचे राज्य सरचिटणीस वैभव खेडेकर (Vaibhav Khedekar) यांनी त्यांचे  मनातील भावनांना सोशल मीडियावर वाट करून दिली, त्यामुळे वैभव खेडेकरांची नाराजी उघडपणे समोर आली आणि चर्चांना  उधाण आले आहे. 

मी राज ठाकरे यांची भक्ती केली, इतरांसारखे त्यांचे नाव वापरून व्यापार नाही केला अशी पोस्ट वैभव खेडेकर यांनी फेसबुकवर केली आहे. तर निष्ठावतांना पक्षात कवडीचीही किंमत पक्षात नसते, असं स्टेट्स त्यांनी व्हाट्सआपवर ठेवलं होतं. त्यामुळे कोकणातील मनसेत सर्व काही अलबेल नसल्याचं स्पष्ट झालं आहे. राज ठाकरेंच्या निष्ठावान, आणि खंद्या समर्थकाने आपली नाराजी अशी थेट व्यक्त केल्याने अनेक तर्क वितर्क लावले जात आहेत.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

नाराजीचं कारण काय ?

वैभव खेडेकर गेल्या काही दिवसांपासून पक्षात नाराज असल्याच्या चर्चा आहेत.  रत्नागिरी जिल्ह्यातील काही पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशाने आणि राज्य सरचिटणीस वैभव खेडेकर यांच्या सहीने एप्रिल महिन्यात झाल्या होत्या.. मात्र मे महिन्याच्या शेवटी या नियुक्त्यांना वरिष्ठ स्तरावरून अचानक स्थगिती देण्यात आली. त्यासाठी कोणतंही सबळ कारण देण्यात आलं नाही.

त्यामुळे पदाधिकारी देखील संभ्रमात आहेत. वैभव खेडेकर यांच्या नाराजीचं हे देखील एक कारण असण्याची शक्यता आहे.. तसेच काही वर्षांपूर्वी जे पक्ष सोडून गेले, त्यांना आता पुन्हा पक्षात घेतलं जातं आहे. ही बाबही खेडेकर यांना पटलेली नाही.  

Advertisement

मनसे नेते वैभव खेडेकर

शिवसेना नेत्यांकडून अप्रत्यक्ष ऑफर

काही दिवसांपूर्वी खेडमध्ये झालेल्या एका मंदिर जीर्णोद्धार कार्यक्रमात उदय सामंत आणि रामदास कदम यांनी व्यासपीठावर उपस्थित असलेल्या वैभव खेडेकर यांना शिवसेनेत येण्याची अप्रत्यक्षपणे ऑफर दिली होती. 

यावेळी उद्योग मंत्री उदय सामंत यांनी बोलताना म्हटलं होतं की, भैरवनाथाची ही इच्छा असू  शकते की,  जे व्यासपीठ इथं तयार झालं आहे, ते जसंच्या तसं भाईंच्या नेतृत्वाखाली इथं राहावं असं खेडेकर यांचं नाव घेऊन सामंत म्हणाले होते.. तर शिवसेना नेते रामदास कदम  हाच धागा पकडत म्हणाले होते, उदयजी चांगले बोललात मी तुम्हाला साखर भरवेन, समझनेवाले को इशारा काफी होता है, काही लोकांना काय समजायचं ते समजलं असेल.

Advertisement

वैभव खेडेकर यांचा राजकीय गुरू मीच आहे, मीच त्यांना राज ठाकरे यांच्याकडे मीच घेऊन गेलो होतो. आपण ही सर्व एकाच कुटुंबातील माणसं आहोत. असं रामदास कदम यांनी खेडेकरांचं कौतुक केलं होतं.

Advertisement

( नक्की वाचा :  Nashik News : 'माझा कार्यकर्ता' ठाकरेंच्या शहरप्रमुखांच्या घरात लग्न, शिंदे वऱ्हाडी! खिंडार पडणार? )

'शिवसेनेत स्वागत'

दरम्यान याबाबत राज्यमंत्री आणि शिवसेना युवा नेते योगेश कदम यांनी वैभव खेडेकर शिवसेनेत आले तर स्वागतच आहे अशी प्रतिक्रिया रत्नागिरी दौऱ्यात दिली.  तसेच रामदास भाईंनी जे वक्तव्य केलं होतं, ते उदय सामंत साहेब यांच्या वक्तव्याला जोडून होतं, त्याचा वेगळा अर्थ काढणं चुकीचं होईल. खेडेकर यांनी कोणत्या पक्षात जावं यावं हा त्यांचा प्रश्न आहे, पण ते शिवसेनेत आले तर स्वागतच आहे असं योगेश कदम यांनी म्हटलं आहे.. 

राज ठाकरेंची भेट घेणार?

दरम्यान, वैभव खेडेकर यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भेटीसाठी वेळ मागितली आहे.  भेट मिळाली तर आपलीच नव्हे तर जिल्ह्यातील महाराष्ट्र सैनिकांच्या व्यथा ते राज ठाकरे यांच्यासमोर मांडणार आहेत. त्यामुळे आपल्याला योग्य तो न्याय मिळेल अशी अपेक्षा वैभव खेडेकर यांना असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे..त्यामुळे आगामी काळात वैभव खेडेकरांची नाराजी राज ठाकरे दूर करतात की वैभव खेडेकर कोणता वेगळा निर्णय घेतात याकडे संपूर्ण कोकणचं लक्ष लागलं आहे.

Topics mentioned in this article