- नीतीश कुमार यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिल्याने बिहारमध्ये दोन दशकांचा नीतीश युगाचा अंत झाला आहे
- सम्राट चौधरी यांना भाजप विधीमंडळ पक्षाने बिहारचे पहिले भाजप मुख्यमंत्री म्हणून निवडले आहे
- सम्राट चौधरी यांनी राजकीय कारकिर्दीची सुरुवात राजदमध्ये केली आणि नंतर जदयू व भाजपमध्ये काम केले आहे
बिहारच्या राजकारणातला सस्पेन्स अखेर संपला आहे. शिवाय आज एका ऐतिहासिक युगाचा अंत झाला आहे. गेल्या दोन दशकांपासून राज्याच्या सत्तेवर पकड असणाऱ्या 'नीतीश युगा'ला पूर्णविराम मिळाला आहे. आता राज्याची धुरा सम्राट चौधरी यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. भाजपच्या वाढत्या वर्चस्वाचे आणि बिहारमधील एका नव्या नेतृत्वाचे हे प्रतीक मानले जात आहे. नितीश कुमार यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला. त्यानंतर कोण असा प्रश्न उपस्थित केला जात होता. भाजप विधीमंडळ पक्षाची त्यानंतर बैठक झाली. त्यात नेतेपदी सम्राट चौधरी यांची निवड करण्यात आली. ते आता बिहारचे भाजपचे पहिले मुख्यमंत्री असतील.
सम्राट चौधरी यांचा जन्म 16 नोव्हेंबर 1968 रोजी मुंगेर जिल्ह्यातील लखनपूर गावात झाला. त्यांचे वडील शकुनी चौधरी हे माजी लष्करी जवान आणि दिग्गज नेते होते. सम्राट यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात राजद (RJD) मधून केली. सन 2000 मध्ये परबत्ता विधानसभा मतदारसंघातून निवडून आल्यानंतर, वयाच्या अवघ्या 25 व्या वर्षी राबड़ी देवी यांच्या सरकारमध्ये त्यांनी मंत्रीपद भूषवले होते. सर्वात लहान वयाचे मंत्री म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली होती. त्यानंतर त्यांनी राजकारणात कधी ही मागे वळून पाहीले नाही.
2014 मध्ये सम्राट चौधरी यांनी जदयू (JDU) मध्ये प्रवेश केला होता. मात्र तिथे फार काळ न टिकता 2017 मध्ये त्यांनी भाजपची वाट धरली. भाजपने त्यांच्यातील क्षमता ओळखून त्यांना आधी प्रदेश उपाध्यक्ष आणि नंतर विधान परिषदेवर पाठवले. 2020 च्या विधानसभा निवडणुकीनंतर ते नीतीश कुमार यांच्या मंत्रिमंडळात पुन्हा मंत्री झाले. गेल्या वर्षी मार्चमध्ये त्यांच्याकडे बिहार भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी सोपवण्यात आली होती. ते भाजपमध्ये एकएक पायरी चढत गेले. ते भाजपचे राज्यातील सर्वात ताकदवान नेते बनले.
बिहारच्या राजकारणात 'लव-कुश' (कुर्मी-कोइरी) हे समीकरण अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. सम्राट चौधरी हे कोइरी (कुशवाहा) समाजाचे मोठे नेते आहेत. एकेकाळी नीतीश कुमार यांना सत्तेतून खाली खेचण्यासाठी डोक्याला 'मुरेठा' (पगडी) बांधणारे सम्राट चौधरी आज भाजपच्या पाठिंब्याने राज्याचे मुख्यमंत्री बनले आहेत. त्यांच्या निवडीमुळे ओबीसी व्होट बँक अधिक मजबूत होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यांना नितीश कुमार यांच्या जनता दल संयुक्त यांचा पाठिंबा आहे हे विशेष म्हणावे लागेल. बिहारमधील तिन्ही ताकदवान पक्षात चौधरी यांनी काम केले आहे. त्याचा फायदा त्यांना सरकार चालवताना होणार आहे.