'उद्धव ठाकरे यांनी आदित्यच्या डोक्यावर हात ठेवून सांगावे की...' पाटलांचे थेट आव्हान

पन्नास कोटी घेवून शिंदे गटात गेल्याचा या आमदारांवर आरोप केला गेला. आता त्यावर शिंदे गटाचे आमदार शहाजीबापू पाटील यांनी मोठं वक्तव्य केलं आहे.

Advertisement
Read Time: 2 mins
सोलापूर:

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर शिवसेना ठाकरे विरुद्ध शिवसेना शिंदे गटात वाद उफाळून येण्याची शक्यता आहे. ज्या वेळी शिवसेनेत फुट पडली त्यावेळी पन्नास खोके एकदम ओके ही घोषणा चांगलीच गाजली. शिंदें बरोबर गेलेले आमदार कुठेही दिसले तरी पन्नास खोके ही घोषणा हमखास ऐकू येत होती. पन्नास कोटी घेवून शिंदे गटात  गेल्याचा या आमदारांवर आरोप केला गेला. आता त्यावर शिंदे गटाचे आमदार शहाजीबापू पाटील यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. त्यात त्यांनी थेट उद्धव ठाकरे यांनाच आव्हान दिलं आहे. त्यामुळे या पुढच्या काळात दोन्ही शिवसेनेत वाद पेटण्याची दाट शक्यता आहे. 

'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

पन्नास खोके एकदम ओके हे  शहाजी बापू पाटील यांच्या जिव्हारी लागले आहे. त्यांनी याबाबत बोलताना, मी माझ्या मुलाच्या डोक्यावर हात ठेवून शपथ घेवून सांगतो, की आम्ही पन्नास खोके घेतले नाही. आम्ही पन्नास खोके घेतले हे माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी आदित्यच्या डोक्यावर हात ठेवून सांगावे, असे थेट आव्हान सांगोल्याचे आमदार शहाजी बापू पाटील यांनी उध्दव ठाकरेंना दिले आहे. 

ट्रेंडिंग बातमी - 'फडणवीसांनी दबाव टाकून आमचे घर फोडले' बड्या नेत्याचा बडा आरोप

पन्नास खोके एकदम ओके असं बोलून आमदारांना हिणवणं योग्य नाही असं शहाजी बापू पाटील म्हणाले. मुख्यमंत्री होण्यासाठी उध्दव ठाकरे विधानसभेची एकही जागा लढणार नाहीत. फक्त मला मुख्यमंत्री करा असं म्हणतील. पण उध्दव ठाकरे मुख्यमंत्री कधीच होणार नाहीत की काळया दगडावरची पांढरी रेष आहे असेही यावेळी पाटील म्हणाले. गेली अडीच वर्ष संजय राऊत यांचे रोज एकपात्री नाटक बघून राज्यातील जनता वैतागली आहे असं ही ते म्हणाले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विकास कामांमुळे विरोधकांच्या पोटात पोटशूळ उठला आहे. त्यांचे नाटक म्हणजे फेक नरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न आहे असं ही ते म्हणाले. 

ट्रेंडिंग बातमी - ग्राहकांसाठी Good News; सिडकोच्या घरांच्या किमती 10 टक्क्यांनी कमी होणार!

एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंड करत उद्धव ठाकरे यांचे सरकार पाडलं. त्यानंतर आमदारांना घेवून ते सुरत, गुवाहाटी, गोवा मार्गे ते मुंबईत आले होते. त्यावेळी शिवसेना ठाकरे गटाने आक्रमक होत संपूर्ण महाराष्ट्रात पन्नास खोके एकदम ओके ही घोषणा दिली जात होती. शिंदेंच्या आमदारांकडे सर्व जण संशयाने पाहात होते. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीतही याचा फटका शिंदेंच्या उमेदवारांना बसल्याचं पाहायला मिळालं. विधानसभेला ही याचे पडसाद उमटण्याची दाट शक्यता आहे.