आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपूर्वी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने एक मोठा निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे. भाजप वगळता इतर कोणत्याही पक्षासोबत युती करण्यासाठी राशप तयार झाली आहे. याचा अर्थ अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसशीही युती करण्यासाठी शरद पवारांचा पक्ष अनुकूल आहे.
नक्की वाचा : जयंत पाटील यांच्याबाबत शरद पवारांची भूमिका ठरली, कार्यकर्त्यांना जाहीरपणे सांगितली
युती-आघाडीचा निर्णय स्थानिक नेत्यांशी बोलून घेणार
10 जून रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा वर्धापन दिन साजरा करण्यात आला होता. या कार्यक्रमात बोलताना शरद पवारांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महिला आणि नव्या कार्यकर्त्यांना अधिकची संधी देणार असल्याचे म्हटले होते. शरद पवारांनी आपल्या भाषणात म्हटले होते की, "दोन-तीन महिन्यात निवडणुका येतील, त्यात जिल्ह्याच्या नेतृत्वाला विश्वासात घेऊन निवडणुका कशा लढायच्या, एकट्याने का कोणाला सोबत घेऊन लढायच्या याचा विचार त्या जिल्ह्याच्या नेतृत्वाला विश्वासात घेऊन करण्याची वेळ आली आहे. असं झाल्यास नव्या नेतृत्वाची फळी जिल्ह्याजिल्ह्यात दिसेल. पुढचे तीन महिने तुमच्या भागातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये नवे नेतृत्व कसे आणायचे, महिलांना पुढे कसे आणायचे याबद्दल विचार करा. "
दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसने एकत्र यावे अशी कार्यकर्त्यांची इच्छा
शरद पवारांनी आपल्या भाषणात सांगितल्याप्रमाणे स्थानिक पातळीवर युती कोणासोबत करायची याचे सर्व अधिकार तिथल्या नेत्यांवर सोपविले जाणार आहेत. या नेत्यांना कोणासोबत आघाडी करायची याबाबत निर्णय घ्यायचा असल्यास पक्ष नेतृत्वाकडून त्याबाबतचे स्पष्ट मार्गदर्शन होणे गरजेचे होते. या अनुषंगाने शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपसोडून कोणत्याही पक्षासोबत युती करण्यासाठी तयार असल्याची भूमिका स्वीकारल्याचे कळते आहे.
नक्की वाचा : मोठा भाऊ की 'देवा' भाऊ? मनसेचं नेमकं 'राज'कारण काय?
स्थानिक पातळीवर युती करत असताना आता शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेससमोर अजित पवारांच्याही राष्ट्रवादी काँग्रेसचा पर्याय निर्माण झाला आहे. सोबतच एकनाथ शिंदेंची शिवसेना, एमआयएम, समाजवादी पक्ष, आणि इतर छोट्या-मोठ्या पक्षांसोबतही त्या-त्या भागात युती करण्याचे पर्याय खुले झाले आहेत. महाविकास आघाडीमध्ये मतभेद कायम असून ते दिवसेंदिवस वाढत चालल्याचे चित्र पाहायला मिळते आहे. जर आगामी निवडणुका मविआ म्हणून लढता आल्यानाही तर आपल्यासमोर अन्य पर्यायही खुले असणे गरजेचे असले पाहीजे असे शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला वाटत असावे आणि त्यातूनच हा प्रॅक्टीकल निर्णय घेण्यात आला असावा असा कयास बांधला जात आहे.