Iran-Israel War: इराण-इस्त्रायल दरम्यान सुरू असलेल्या युद्धाचा आज (21 जून) नववा दिवस आहे. 13 जूनपासून सुरू झालेल्या या युद्धात दोन्ही देशांमध्ये मोठ्या प्रमाणात जीवित आणि मालमत्तेचं नुकसान झालं आहे. इराण-इस्त्रायलच्या या संघर्षावर जगातील अनेक देशांनी आपापल्या धोरणांनुसार प्रतिक्रिया दिल्या आहेत.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
या युद्धात भारत अद्याप कोणत्याही बाजूने किंवा कोणत्याही विरोधात स्पष्ट प्रतिक्रिया दिलेली नाही. दरम्यान, शनिवारी काँग्रेस संसदीय पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी मोदी सरकारच्या पश्चिम आशियाशी संबंधित परराष्ट्र धोरणावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. 'द हिंदू' या इंग्रजी वृत्तपत्रात सोनिया गांधी यांनी एक लेख लिहून गाझा आणि इराणविरोधात इस्त्रायलच्या कारवाईवर सरकार शांत असल्याचा आरोप केला आहे.
'इराणवरील हल्ला बेकायदेशीर'
सोनिया गांधींनी 'It is still not too late for India's voice to be heard' या शीर्षकाने लिहिलेल्या आपल्या लेखात इराणवरील इस्त्रायलचा हल्ला बेकायदेशीर आणि सार्वभौमत्वाचे उल्लंघन करणारा असल्याचे म्हटले आहे.
गाझानंतर आता इराणमध्येही प्रादेशिक अस्थिरता आणि लोकांच्या जीवनाची पर्वा न करता इस्त्रायलने लष्करी कारवाई केली आहे. काँग्रेस पक्षाने इराणमध्ये झालेल्या बॉम्ब हल्ल्याचा तीव्र निषेध केला आहे, ज्याचे दूरगामी जागतिक परिणाम होणार आहेत, असा दावा सोनियांनी केला आहे.
( नक्की वाचा : Iran-Israel Conflict : Whatsapp तातडीनं डिलिट करा, इराणनं का दिलाय नागरिकांना आदेश? )
'भारताचे शांत राहणे चिंताजनक'
या प्रकरणात भारत शांत आहे, ही चिंतेची बाब असून भारताच्या स्थापित कूटनीतिक आणि नैतिक परंपरांच्या विरोधात आहे, अशी आठवण सोनिया गांधींनी करुन दिली आहे. भारतासाठी अजूनही उशीर झालेला नाही. आपण स्पष्ट भूमिका घेतली पाहिजे, अशी मागणी सोनियांनी केली. भारताने जबाबदारीने वागून सर्व कूटनीतिक पद्धतींचा वापर केला पाहिजे, ज्यामुळे तणाव कमी करण्यास आणि चर्चा सुरू करण्यास मदत होईल, असं त्यांनी या लेखात स्पष्ट केले आहे.