State Election Commision Press Conference : राज्यात 29 महानगरपालिकांची रणधुमाळी सुरु असून आज मतदान प्रक्रिया पार पडत आहे. परंतु, मतदान केंद्रावर निवडणूक आयोगाकडून मतदारांच्या बोटावर मार्करने शाई लावली जात आहे, यावर विरोधकांनी आक्षेप घेतला आहे. मार्करची शाई काही वेळातच पुसली जात असल्याचे व्हिडीओ विरोधी पक्षाच्या नेत्यांनी व्हायरल केले आहेत. त्यामुळे राजकीय वर्तुळात अनेक तर्क वितर्कांना उधाण आलं आहे. अशातच राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी यावर स्पष्टीकरण दिलं आहे.राज्य निवडणूक आयोग 2010 पासून मार्कर पेनची शाई लावते. 2010 पासून कोरस कंपनीचे मार्कर पेन आहे. सोशल मीडियावरून आमच्याकडे जे व्हिडीओ आले आहेत, त्यानुसार आम्ही संबंधीतांवर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. मतदारांची पण जबाबदारी आहे. मतदारांनीही शाई पुसू नये. ड्राय व्हायला थोडा वेळ लागतो.त्याच्याआधीच जर शाई पुसली, तर ती मतदारांची चुकी आहे. मतदारांविरोधातही गुन्हा दाखल होऊ शकतो, असा इशारा वाघमारे यांनी दिला आहे.
राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे नेमकं काय म्हणाले?
"शाई भारत निवडणूक आयोग जे केमिकल शाईमध्ये वापरतं, ते सिल्व्हर नायट्राईड जे केमिकल आहे, तेच केमिकल्सची शाई आम्ही वापरतो. भारत निवडणूक आयोग शाई काडीने लावते. पण राज्य निवडणूक आयोग 2010 पासून मार्कर पेनची शाई लावते. 2010 पासून कोरस कंपनीचे मार्कर पेन आहे. आपणही कोरस कंपनीचेच पेन वापरलेले आहेत. मात्र ती शाई ड्राय व्हायला दहा ते बारा सेकंद लागतात. पण तोपर्यंत तो मतदार मतदान केंद्राच्या आतमध्येच असतो. त्यामुळे ती शाई एकदा ड्राय झाली की, ती निघू शकत नाही",असं दिनेश वाघमारे यांनी पत्रकार परिषदेत म्हटलं आहे.
नक्की वाचा >> Voter Ink : मतदानाच्या वेळी Index Finger वरच का लावली जाते शाई? मतदाराला दोन हात नसल्यास मतदान करता येतं का?
वाघमारे पुढे म्हणाले, "विरोधकांनी मार्करची शाई पुसली जात असल्याचे व्हिडीओ शेअर केले आहेत. यावर बोलकाना दिनेश वाघमारे म्हणाले, त्यांनी कोणतं केमिकल वापरलं आणि कशा पद्धतीने ते काढलं. त्याबद्दल माहित नाही. कोणी तक्रार केली असेल तर चौकशी करू. चुकीच्या पद्धतीने जर व्हिडीओ रेकॉर्ड करून मतदारांमध्ये संभ्रम निर्माण करत असतील, तर संबंधीतांवर आम्ही ताबडतोब गुन्हा दाखल करू.ते व्हिडीओ खरे असतील, तर त्याची आम्ही चौकशी करू. सोशल मीडियावरून आमच्याकडे जे व्हिडीओ आले आहेत, त्यानुसार आम्ही संबंधीतांवर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. मतदारांची पण जबाबदारी आहे. मतदारांनीही शाई पुसू नये. ड्राय व्हायला थोडा वेळ लागतो.त्याच्याआधीच जर शाई पुसली, तर ती मतदारांची चुकी आहे. मतदारांविरोधातही गुन्हा दाखल होऊ शकतो".