- तामिळनाडू विधानसभा निवडणुकीत विजय यांच्या TVK पक्षाला 108 जागा मिळाल्या, पण बहुमतीसाठी 118 जागा आवश्यक आहेत
- राज्यपालांच्या भेटीनंतरही सत्तास्थापनेचा निर्णय अनिश्चित असून त्रिशंकू स्थिती कायम आहे
- डीएमके आणि एआयएडीएमके पक्षांनी ५० वर्षांनंतर एकत्र येण्याची शक्यता आहे
तामिळनाडू विधानसभा निवडणूक 2026 च्या निकालांनी राज्याच्या राजकारणात मोठा पेच निर्माण केला आहे. अभिनेता विजय यांच्या 'तमिझगा वेत्री कळघम' (TVK) पक्षाने 108 जागा जिंकून सर्वात मोठा पक्ष होण्याचा मान मिळवला आहे. मात्र, बहुमतासाठी आवश्यक असलेल्या 118 या आकड्यापासून विजय अजूनही 10 पावले दूर आहेत. राज्यपाल राजेंद्र विश्वनाथ आर्लेकर यांच्या भेटीनंतरही सत्तास्थापनेचे चित्र स्पष्ट झालेले नाही. दुसरीकडे, विजय यांना सत्तेपासून रोखण्यासाठी कट्टर प्रतिस्पर्धी डीएमके आणि एआयएडीएमके एकत्र येण्याची शक्यताही वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे तामिळनाडूमध्ये ट्वीस्ट निर्माण झाला आहे. सध्या तरी त्रिशंकू स्थिती दिसत आहे.
राष्ट्रपती राजवटीची शक्यता?
जर कोणत्याही पक्षाला किंवा युतीला बहुमत सिद्ध करता आले नाही, तर तामिळनाडूमध्ये राष्ट्रपती राजवट लागू होऊ शकते. ही राजवट सहा महिन्यांसाठी असते. या काळातही तोडगा न निघाल्यास निवडणूक आयोगाला वर्षाच्या अखेरीस पुन्हा निवडणुका घ्याव्या लागतील. पुन्हा निवडणुकांचा खर्च आणि अनिश्चितता पाहता सर्वच राजकीय पक्ष सध्या सावध पावले टाकत आहेत. त्यात सहा महिने आपण कोणताही हस्तक्षेप करणार नाही असं डीएमकेने स्पष्ट केले आहे. त्यामुळे त्यांची ही प्रतिक्रीया फारच बोलकी आहे.
नक्की वाचा - Tamil Nadu: TVK चे 108 आमदार राजीनामा देणार? तामिळनाडूत राजकीय भूकंप, सत्तासंघर्ष पेटला
डीएमके-एआयएडीएमके युतीचा फॉर्म्युला
सर्वात धक्कादायक चर्चा म्हणजे 50 वर्षांचे वैर विसरून डीएमके आणि एआयएडीएमके एकत्र येण्याची शक्यता आहे. या दोन्ही पक्षांकडे मिळून 106 जागा आहेत. बहुमतासाठी त्यांना काँग्रेस, डावे पक्ष आणि इतर छोट्या पक्षांच्या 12 आमदारांची गरज भासेल. मात्र,9 विविध विचारधारांच्या पक्षांना एकत्र ठेवणे हे अत्यंत आव्हानात्मक काम असेल. शिवाय जुनं वैर विसरून हे दोन्ही पक्ष एकत्र येतील का असा प्रश्न आहे. तसं झाल्यास तामिळनाडूच्या राजकारणातील हा सर्वात मोठा चमत्कार असेल.
विजय यांचा 'मास्टर प्लॅन' काय असू शकतो?
विजय सत्तेत येण्यासाठी एआयएडीएमकेमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करू शकतात. पक्षांतर बंदी कायद्यातून वाचण्यासाठी त्यांना एआयएडीएमकेच्या 34 आमदारांचा पाठिंबा लागेल. याशिवाय, ते काँग्रेस आणि पीएमके सारख्या पक्षांना 'उपमुख्यमंत्री' पदाची ऑफर देऊन आपल्या बाजूने वळवू शकतात. जर त्यांना डावे पक्ष आणि मुस्लिम लीगची साथ मिळाली, तर हा आकडा 123 पर्यंत जाऊ शकतो.
नक्की वाचा - Success Story: कमालच केली! पान विकून बनला करोडपती, 400 दुकाने अन् 7 कोटींची उलाढाल
सामूहिक राजीनाम्याचे अस्त्र
राजकारणात दबाव निर्माण करण्यासाठी विजय यांच्या पक्षाचे 108 आमदार सामूहिक राजीनामा देऊ शकतात. 1972 मध्ये पश्चिम बंगालमध्ये असा प्रकार घडला होता. असे झाल्यास लोकशाहीच्या जनादेशावर प्रश्नचिन्ह उभे राहील आणि राज्यपालांवर निर्णय घेण्याचा मोठा दबाव निर्माण होईल. त्यामुळे तामिळनाडूच्या राजकारणाकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. विजय यांना जनाधार मिळाला असला तरी बहुमत मिळालेले नाही. त्यामुळे तिथेच पेच फसला आहे. त्यातून ते आता कसा मार्ग काढतात याकडे सर्वांचे लक्ष आहे.