Anaya Bangar's Emotional Post for Father Sanjay Bangar: मुलाचा जन्म, क्रिकेटचं मैदान आणि वडिलांचं वलय... हे सर्व बाजूला सारून स्वतःची खरी ओळख शोधण्यासाठी एका व्यक्तीने सुरू केलेला प्रवास आज एका महत्त्वाच्या टप्प्यावर येऊन पोहोचला आहे. टीम इंडियाचे माजी बॅटर आणि प्रशिक्षक संजय बांगर यांचा मुलगा आर्यन आता अधिकृतपणे अनाया बांगर झाली आहे.
थायलंडमध्ये झालेली जेंडर अफर्मिंग सर्जरी यशस्वी झाल्यानंतर अनायाने सोशल मीडियावर आपल्या वडिलांसाठी जे लिहिले आहे, ते वाचून कोणाचेही डोळे पाणावतील. हा प्रवास केवळ एका ऑपरेशनचा नव्हता, तर तो स्वीकारण्याचा आणि बाप-लेकीच्या नात्यातील एका नव्या संघर्षाचा होता.
लढाई स्वतःशी आणि समाजाशी
अनायाचा जन्म एका मुलाच्या रूपात झाला होता, मात्र तिची खरी ओळख तिला आतून साद घालत होती. स्वतःच्या शरीरात बदल करून मुलगी होण्याचा निर्णय घेणे अनायासाठी सोपे नव्हते. तिला या प्रवासात प्रचंड टीकेचा आणि विरोधाचा सामना करावा लागला, मात्र ती डगमगली नाही.
अखेर थायलंडमध्ये तिची शस्त्रक्रिया पूर्ण झाली असून सध्या ती रिकव्हरी फेजमध्ये आहे. या काळात सावलीसारखे सोबत उभे राहिलेल्या आपल्या वडिलांसाठी तिने व्यक्त केलेली कृतज्ञता सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.
( नक्की वाचा : Sara Tendulkar 'माझं हृदय आता तुझ्याकडे सुरक्षित'; अर्जुनच्या लग्नात सारा तेंडुलकरने वहिनीकडे मागितलं एकच वचन! )
वडिलांचा पाठिंबा आणि बदललेला दृष्टीकोन
अनायाने हॉस्पिटलमधील एक भावूक फोटो शेअर करत लिहिले की, सुरुवातीला तिच्या वडिलांना हा बदल स्वीकारणे खूप कठीण गेले होते. एका प्रसिद्ध क्रिकेटपटूसाठी आपल्या मुलाचे मुलीत रूपांतर होणे ही गोष्ट पचवायला वेळ लागला.
अनाया सांगते की, हा प्रवास आमच्या दोघांसाठीही सोपा नव्हता. मनात अनेक शंका होत्या, गोंधळ होता आणि समाजात वावरताना येणारे प्रश्नही होते. पण वेळ लागला तरी वडिलांनी तिला समजून घेतले आणि हीच तिची सर्वात मोठी ताकद ठरली.
वेळ लागला पण प्रेम जिंकले
आपल्या पोस्टमध्ये अनायाने अत्यंत काळजाला भिडणारे शब्द वापरले आहेत. ती म्हणते, मला समजून घेणे आणि स्वीकारणे ही गोष्ट रातोरात घडली नाही. त्यासाठी खूप वेळ लागला, पण जेव्हा तो पाठिंबा मिळाला, तेव्हा तो पूर्णपणे बिनशर्त आणि भक्कम होता. ऑपरेशन हा माझ्या आयुष्यातील सर्वात मोठा निर्णय होता आणि अशा वेळी वडिलांनी सोबत असणे माझ्यासाठी सर्वस्व आहे. प्रेमाला वेळ लागतो, पण जेव्हा ते मिळते तेव्हा सर्व कष्टांचे सार्थक होते, असे तिने स्पष्ट केले आहे.
जिद्दीला सोशल मीडियाचा सलाम
अनाया बांगरच्या या धाडसी निर्णयाचे आणि तिच्या वडिलांच्या सामंजस्याचे सोशल मीडियावर मोठे कौतुक होत आहे. अनेकांनी या पोस्टवर कमेंट्स करून अनायाला तिच्या नव्या आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. टीकेला न घाबरता आपल्या अस्तित्वासाठी लढणाऱ्या अनायाची ही कथा अनेकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. एका खेळाडूच्या कुटुंबात झालेला हा वैचारिक बदल आधुनिक समाजासाठी एक मोठे उदाहरण ठरत आहे.