भारताने रविवारी इतिहास रचला आहे. बुद्धिबळ ऑलिम्पियाडमध्ये (Chess Olympiad 2024) भारताचे प्रथमच सुवर्णपदक जिंकलं आहे. भारताच्या पुरुष आणि महिला संघांनी 45 व्या बुद्धिबळ ऑलिम्पियाडच्या अंतिम फेरीत प्रथमच सुवर्णपदक पटकावलं आहे.
हंगेरीची राजधानी बुडापेस्ट येथे 45 वे बुद्धिबळ ऑलिम्पियाड आयोजित करण्यात आले होते. यामध्ये पुरुष गटात 195 देशांतील 197 संघ आणि महिला गटात 181 देशांतील 183 संघ सहभागी झाले होते. ग्रँडमास्टर डी गुकेश, अर्जुन इरिगेसी आणि आर प्रग्नानंद यांनी स्लोव्हेनियाविरुद्ध 11व्या फेरीत सामने जिंकले. जागतिक चॅम्पियनशिपचे आव्हानवीर गुकेश आणि अर्जुन एरिगेसी यांनी पुन्हा एकदा महत्त्वाच्या सामन्यांमध्ये चांगली कामगिरी करून भारताला खुल्या गटात पहिलं विजेतेपद पटकावण्यास मदत केली.
भारतीय संघाने उर्वरित दोन सामने गमावले असते तरी ते सुवर्णपदकाचे मानकरी ठरले असते. कारण त्यांना विजेतेपदासाठी 11व्या फेरीत फक्त ड्रॉची आवश्यकता होती.
भारतीय महिलांनी अझरबैजानचा 3.5-0.5 असा पराभव करून देशासाठी सुवर्णपदक जिंकले. डी हरिकाने पहिल्या बोर्डावर तांत्रिक श्रेष्ठता दाखवली आणि दिव्या देशमुखने पुन्हा एकदा तिच्या प्रतिस्पर्ध्याला पराभूत करून तिसऱ्या बोर्डावर वैयक्तिक सुवर्णपदकावर शिक्कामोर्तब केले.
आर वैशालीने ड्रॉ खेळल्यानंतर, वंतिका अग्रवालच्या शानदार विजयामुळे भारतीय संघाचे सुवर्णपदक निश्चित झाले. भारतीय पुरुष संघाने यापूर्वी 2014 आणि 2022 च्या स्पर्धेत कांस्यपदक जिंकले होते. 2022 च्या चेन्नई येथे झालेल्या स्पर्धेत भारतीय महिला संघाने कांस्यपदक जिंकले होते.