आगामी टी20 वर्ल्ड कप 2026 च्या यजमानपदावरून आणि सामन्यांच्या ठिकाणावरून आंतरराष्ट्रीय क्रिकेट विश्वात मोठा भूकंप झाला आहे. बांगलादेश सरकारने आपली टीम कोणत्याही परिस्थितीत भारतात पाठवणार नाही, अशी ठाम भूमिका घेतली असून आता पाकिस्ताननेही यात उडी घेतली आहे.
वादाचे मुख्य कारण काय?
या वादाची ठिणगी आयपीएल (IPL) मधील एका निर्णयामुळे पडली. बीसीसीआयच्या (BCCI) निर्देशावरून कोलकाता नाईट रायडर्सने बांगलादेशचा वेगवान गोलंदाज मुस्तफिझूर रहमानला संघातून बाहेर काढले. या निर्णयाचा निषेध म्हणून आणि सुरक्षा कारणांचा हवाला देत बांगलादेश क्रिकेट बोर्डाने (BCB) कोलकता आणि मुंबईत होणारे आपले साखळी सामने भारतात खेळण्यास नकार दिला आहे.
(नक्की वाचा- Cricket News: विराट-रोहितला मोठा धक्का बसण्याची शक्यता; काय आहे BCCI चा प्लॅन?)
पाकिस्तानचा बांगलादेशला साथ
ईएसपीएनक्रिकइन्फोच्या अहवालानुसार, पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने आयसीसीला पत्र लिहून बांगलादेशच्या मागणीचे समर्थन केले आहे. याआधी पाकिस्तानच्या मागणीवरून सामने बदलण्यात आले होते, तोच दाखला आता बांगलादेश देत आहे.
"आमची टीम भारत दौऱ्यावर जाणार नाही" - आसिफ नझ्रुल
बांगलादेशचे क्रीडा सल्लागार आसिफ नझ्रुल यांनी स्पष्ट केले की, आयसीसीने 21 जानेवारीपर्यंतचा अल्टिमेटम दिला असला तरी आम्ही दबावाखाली येणार नाही.
(नक्की वाचा-Video : शांतपणे मटार सोलणाऱ्या गर्लफ्रेंडवर शिखर धवन संतापला, ओरडत ओरडत म्हणाला, "माझं आयुष्य बरबाद..")
बांगलादेशला आपले ग्रुप स्टेजचे चारही सामने श्रीलंकेत खेळायचे आहेत. जर आयसीसीने भारताच्या दबावाखाली चुकीच्या अटी लादल्या, तर बांगलादेश त्या स्वीकारणार नाही. जर बांगलादेशने माघार घेतली, तर रँकिंगनुसार स्कॉटलंडला या स्पर्धेत स्थान मिळू शकते.
काय आहेत आयसीसी समोरील पर्याय?
आयसीसी सध्या आपल्या पूर्वीच्या भूमिकेवर ठाम असून आयोजन स्थळात बदल करण्यास तयार नाही. मात्र, पाकिस्तान आणि बांगलादेश या दोन मोठ्या आशियाई देशांनी एकत्र आघाडी उघडल्यामुळे आजच्या बोर्ड बैठकीत आयसीसीला मध्यम मार्ग काढावा लागू शकतो.