IND vs NZ Final: भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील टी-20 वर्ल्ड कप 2026 चा महामुकाबला आता काही तासांवर येऊन ठेपला आहे. संपूर्ण क्रिकेट विश्वाचे लक्ष या ऐतिहासिक फायनलकडे लागले असून फॅन्समध्ये प्रचंड उत्सुकता आहे. मात्र, या महत्त्वाच्या मॅचपूर्वी आयसीसीने फायनलसाठी काही खास नियम लागू केले आहेत.
ग्रुप स्टेज आणि सेमीफायनलच्या तुलनेत फायनलचे नियम थोडे वेगळे असणार आहेत. जर पावसामुळे मॅचमध्ये व्यत्यय आला किंवा मॅच पूर्णपणे धुऊन निघाली, तर विजेता कसा ठरणार आणि दोन्ही टीम्सना संयुक्त विजेतेपद मिळणार का, याबाबतचे सर्व नियम आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
पावसाचा व्यत्यय आणि ओव्हरचे गणित
सेमीफायनलप्रमाणेच फायनलमध्येही निकालासाठी किमान 10 ओव्हरचा खेळ होणे अनिवार्य आहे. टी-20 क्रिकेटमध्ये साधारणपणे 5 ओव्हरचा खेळ झाला तरी निकाल गृहीत धरला जातो, पण या मोठ्या नॉकआउट सामन्यांसाठी आयसीसीने किमान 10 ओव्हरचा नियम ठेवला आहे.
पहिली बॅटिंग करणारी टीम 10 ओव्हर पूर्ण करू शकली नाही आणि पावसाने हजेरी लावली, तर मॅच रिझर्व्ह-डेला जाईल. जर रिझर्व्ह-डेलाही खेळ झाला नाही, तरच मॅच रद्द केली जाईल.
( नक्की वाचा : Sanju Samson: 'तो' एक निर्णय आणि संजू सॅमसनचे नशीब पालटले, वाचा वादळी पुनरागमनाची सिक्रेट स्टोरी! )
रिझर्व्ह-डे आणि अतिरिक्त वेळ
फायनल मॅचसाठी आयसीसीने अतिरिक्त वेळेत वाढ केली आहे. सेमीफायनलमध्ये 90 मिनिटे एक्स्ट्रा देण्यात आली होती, मात्र फायनलसाठी हा वेळ 120 मिनिटे करण्यात आला आहे. रिझर्व्ह-डेच्या दिवशीही 120 मिनिटांचा अतिरिक्त वेळ उपलब्ध असेल. तसेच, सेमीफायनलमध्ये रिझर्व्ह-डेचा खेळ दुपारी 3 वाजता सुरू होणार होता, पण फायनलचा खेळ रिझर्व्ह-डेला गेल्यास तो संध्याकाळी 7 वाजता सुरू होईल.
जिथे मॅच थांबली होती, तिथूनच पुढचा खेळ सुरू केला जाईल. म्हणजे एखाद्या बॉलरने 9.3 ओव्हर टाकली असेल, तर पुढच्या दिवशी तो 9.4 ओव्हरपासून सुरुवात करेल.
( नक्की वाचा : IND vs ENG: बाउंड्रीवर थांबला अन् काहीतरी पुटपुटला; इंग्लंडविरुद्धच्या महायुद्धापूर्वी गंभीरचा तो अवतार कैद )
विजेता ठरवण्याचा सर्वात मोठा नियम
सर्वात महत्त्वाचा फरक हा सेमीफायनल आणि फायनलच्या टाय-ब्रेकर नियमात आहे. सेमीफायनलमध्ये जर रिझर्व्ह-डेलाही पाऊस पडला आणि मॅच झाली नाही, तर सुपर-8 राऊंडमध्ये पॉईंट टेबलमध्ये वर असलेल्या टीमला फायनलमध्ये प्रवेश दिला जात होता. पण फायनलमध्ये असा कोणताही फायदा मिळणार नाही. जर फायनलचा दिवस आणि रिझर्व्ह-डे दोन्ही दिवशी पावसाने खेळ होऊ दिला नाही, तर भारत आणि न्यूझीलंड या दोन्ही टीम्सना संयुक्त विजेता घोषित केले जाईल.
सुपर ओव्हर आणि ट्रॉफीचा इतिहास
फायनल मॅच टाय झाली आणि काही कारणास्तव सुपर ओव्हर खेळवता आली नाही, तरीही दोन्ही टीम्सना ट्रॉफी शेअर करावी लागेल. क्रिकेटच्या इतिहासात असे खूप कमी वेळा घडले आहे. यापूर्वी 2002 मध्ये आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारत आणि श्रीलंका यांना पावसाच्या व्यत्ययामुळे संयुक्त विजेता घोषित करण्यात आले होते. आता तब्बल 24 वर्षांनंतर तशीच परिस्थिती निर्माण झाल्यास दोन्ही टीम्सना वर्ल्ड चॅम्पियन मानले जाईल.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world