IND vs NZ T20 World Cup Final 2026: टी20 वर्ल्ड कप 2026 ची फायनल ज्या पद्धतीनं झाली, हे पाहून क्रिकेट जगतात सध्या एकाच गोष्टीची चर्चा रंगली आहे. कधीकधी मैदानात उतरण्यापूर्वीच मॅचचा निकाल ठरतो, असं म्हटलं जातं आणि अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर अगदी तसंच पाहायला मिळालं. टॉस जिंकूनही न्यूझीलंडचा त्या एका चुकीमुळे हरली का ? असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे.
न्यूझीलंडचा कॅप्टन मिचेल सँटनर यानं घेतलेला तो एक निर्णय त्यांच्यासाठी थेट पराभवाचं कारण ठरला. या हायव्होल्टेज फायनलमध्ये भारताने 96 रनने दणदणीत विजय मिळवत इतिहासाला गवसणी घातली आहे.
सँटरनरचा 'तो' चुकीचा निर्णय
अहमदाबादच्या ज्या खेळपट्टीवर ही फायनल रंगली, ती फलंदाजांसाठी अक्षरशः नंदनवन मानली जात होती. लाल माती आणि वेगवान आऊटफिल्डमुळे या हायवेसारख्या खेळपट्टीवर धावांचा पाऊस पडणार हे निश्चित होतं. अशा परिस्थितीत टॉस जिंकल्यानंतर बॅटिंग घेणं अपेक्षित असताना सँटनरने मात्र भारताला बॅटिंगसाठी निमंत्रण दिलं.
मॅट हेन्री आणि जॅकब डफी सुरुवातीला विकेट्स काढतील असा त्याचा अंदाज होता, पण तो पूर्णपणे फसला. न्यूझीलंडने आणखी एक मोठी चूक केली ती म्हणजे फॉर्मात असलेल्या कोल मॅकोंचीला टीममध्ये स्थान दिलं नाही, ज्याने सेमीफायनलमध्ये महत्त्वाची कामगिरी केली होती.
( नक्की वाचा : Sanju Samson चा 'देवमाणूस' सचिन तेंडुलकर! बॅट चालत नव्हती तेव्हा देवानेच दिला आधार; भावूक संजूनं सारं सांगितलं )
भारतीय बॅटर्सचा झंझावात
सँटनरचा निर्णय किती चुकीचा होता हे पहिल्या 6 ओव्हरमध्येच स्पष्ट झालं. संजू सॅमसन आणि अभिषेक शर्मा या जोडीने पहिल्या ६ ओव्हरमध्येच 92 रन कुटले आणि कीवी बॉलर्सच्या नाकी नऊ आणले.
संपूर्ण स्पर्धेत शांत असलेल्या अभिषेक शर्माने वादळी खेळी करत 21 बॉलमध्ये 52 रन बनवले. तर संजू सॅमसनने 46 बॉलमध्ये 89 रनची अविस्मरणीय खेळी केली. संजूने मैदानावर चौफेर फटकेबाजी करत एकूण 8 उत्तुंग षटकार खेचले.
या दोघांच्या जोडीला इशान किशनने 25 बॉलमध्ये 54 आणि शिवम दुबेने 8 बॉलमध्ये नाबाद 26 रनचं योगदान दिलं. यामुळे भारताने 5 विकेट्सच्या मोबदल्यात 255 रनचा ऐतिहासिक टप्पा गाठला.
( नक्की वाचा : संजू, इशान अन् बुमराह... ही नावं आता विसरता येणार नाहीत! भारताला वर्ल्ड चॅम्पियन बनवणारे 'हे' आहेत खरे हिरो )
न्यूझीलंडची इनिंग पत्त्यासारखी कोसळली
२५६ रनचं डोंगराएवढं लक्ष समोर असताना न्यूझीलंडचा संघ सुरुवातीपासूनच दबावाखाली दिसला. एका बाजूला टीम साऊदी आणि इतर बॉलर्स अपयशी ठरत असताना न्यूझीलंडच्या बॅटर्सनीही शरणागती पत्करली.
10 ओव्हरमध्येच न्यूझीलंडने 88 रनवर 5 विकेट्स गमावल्या होत्या. टिम सिफर्टने 52 रन बनवून थोडा प्रतिकार केला, पण तो पुरेसा नव्हता. अखेर 19 ओव्हरमध्ये अवघ्या 159 रनवर न्यूझीलंडची संपूर्ण टीम ऑल आऊट झाली. भारताच्या या विजयामुळे संजू सॅमसन आणि अभिषेक शर्मा यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे, तर सँटनरचा तो एक निर्णय न्यूझीलंडच्या फॅन्सच्या कायम जिव्हारी लागणार आहे.