India vs Pakistan World Cup 2026: भारत आणि पाकिस्तान यांच्यात 15 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या हाय-प्रोफाईल वर्ल्ड कप सामन्यावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला (PCB) चांगलाच महागात पडताना दिसत आहे. या निर्णयाला आंतरराष्ट्रीय स्तरावर पाठिंबा मिळवण्यासाठी पाकिस्तानने अनेक क्रिकेट बोर्डांशी संपर्क साधला, पण एकाही देशाने त्यांना साथ दिलेली नाही.
विशेष म्हणजे पाकिस्तान सरकारने सोशल मीडियावरून बहिष्काराची घोषणा केली असली, तरी पीसीबीने अजूनपर्यंत आयसीसीशी (ICC) कोणताही अधिकृत संवाद साधलेला नाही. यामुळे जागतिक क्रिकेटमध्ये पाकिस्तान आता पूर्णपणे एकटा पडला असून त्यांच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे.
इतर क्रिकेट बोर्डांची रोखठोक भूमिका
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आंतरराष्ट्रीय क्रिकेट बोर्डांनी पाकिस्तानला अत्यंत स्पष्ट शब्दांत सुनावले आहे. या प्रकरणात पाकिस्तानची बाजू कायदेशीररीत्या कमकुवत असल्याचे इतर बोर्डांचे मत आहे. बांगलादेशला स्पर्धेतून बाहेर काढल्यामुळे त्यांच्याशी एकजूट दाखवण्यासाठी हा बहिष्कार असल्याचे पाकिस्तान सांगत आहे, मात्र इतर देशांच्या मते हे केवळ एक ओढून ताणून निर्माण केलेले संकट आहे. या भूमिकेमुळे पीसीबी सध्या पूर्णपणे एकाकी पडले आहे.
( नक्की वाचा : T20 WC 2026 : पाकिस्तान क्रिकेटचा THE END? वर्ल्ड कपमधून माघार घेतली तर PSL ही होणार उद्ध्वस्त ! )
पाकिस्तानच्या वागण्यातील दुटप्पीपणा उघड
इतर क्रिकेट बोर्डांनी पाकिस्तानच्या या निर्णयातील विसंगतीकडे सर्वांचे लक्ष वेधले आहे. पाकिस्तानचा युवा संघ नुकताच अंडर 19 वर्ल्ड कपमध्ये भारताविरुद्ध खेळला, तेव्हा त्यांनी कोणताही निषेध किंवा बहिष्काराची भाषा केली नव्हती. याशिवाय, ज्या दिवशी म्हणजे 15 फेब्रुवारी रोजी पुरुष संघाचा सामना आहे, त्याच दिवशी बँकॉक येथे रायझिंग स्टार्स एशिया कप 2026 मध्ये पाकिस्तान महिला अ संघ आणि भारत अ संघ यांच्यात सामना होणार आहे.
हा सामना खेळण्याबाबत पाकिस्तानने कोणतीही माघार घेतलेली नाही, मग केवळ पुरुष संघाच्या सामन्यावरच बहिष्कार का, असा प्रश्न आता विचारला जात आहे.
(नक्की वाचा : T20 World Cup 2026: बांगलादेशला मस्ती नडली! ICC नं केली वर्ल्ड कपमधून हकालपट्टी, स्कॉटलंडचा झाला समावेश )
पाकिस्तानच्या हेतूवरच शंका
बांगलादेशने भारतात जाऊन खेळण्यास नकार दिला होता, कारण त्यांनी सुरक्षेचे कारण दिले होते. मात्र, भारत आणि पाकिस्तान यांच्यातील हा वर्ल्ड कप सामना श्रीलंकेतील कोलंबो येथे खेळवला जाणार आहे. कोलंबो हे एक त्रयस्थ ठिकाण असल्याने बांगलादेशने दिलेल्या कारणाचा पाकिस्तानच्या परिस्थितीशी कोणताही तर्कसंगत संबंध जोडता येत नाही. यामुळे पाकिस्तानचे कारण कमकुवत ठरत असून त्यांच्या हेतूवरच शंका घेतली जात आहे.
आर्थिक संकट आणि आयसीसीची कारवाई
आयसीसीने पाकिस्तानला आधीच इशारा दिला आहे की, अशा प्रकारच्या वर्तणुकीमुळे त्यांच्या क्रिकेट परिसंस्थेवर दीर्घकालीन निर्बंध लादले जाऊ शकतात. जर पाकिस्तानने हा सामना खेळण्यास नकार दिला, तर त्यांना साधारण 38 million डॉलर्सपेक्षा जास्त दंड भरावा लागू शकतो. याशिवाय वर्ल्ड कपमधील महत्त्वाचे गुण गमावावे लागतील आणि पीसीबीवर निलंबनाची टांगती तलवारही असेल. पाकिस्तानकडे अद्याप आपली चूक सुधारण्यासाठी थोडा वेळ शिल्लक आहे, अन्यथा त्यांना मोठ्या आर्थिक विनाशाला सामोरे जावे लागेल.