Bat Tampering allegations: टी-20 वर्ल्ड कप 2026 चा थरार मैदानावर रंगला असतानाच आता मैदानाबाहेर एका वेगळ्याच वादाने तोंड वर काढले आहे. श्रीलंकेचा स्टार बॅटर भानुका राजपक्षे याने भारतीय खेळाडूंच्या बॅटबाबत एक अजब दावा केल्याने क्रिकेट वर्तुळात मोठी खळबळ माजली आहे. भारतीय बॅटर्सकडे काहीतरी खास जादू आहे की काय, अशी शंका येईल असे विधान त्याने एका मुलाखतीत केले असून टीम इंडियाच्या बॅट्सवर जणू रबरचा थर लावलेला असतो, असा खळबळजनक आरोप त्याने केला आहे.
भारतीय बॅट्सचे गुपित काय
भानुका राजपक्षे एका कार्यक्रमात बोलताना म्हणाला की, भारतीय खेळाडूंकडे असलेल्या बॅट्स या आम्हा सर्वांना मिळणाऱ्या बॅट्सपेक्षा कित्येक पटीने सरस आहेत. भारतीय बॅटर शॉट मारतो, तेव्हा त्या बॅटमधून मिळणारा रिस्पॉन्स पाहून त्यावर रबरचा लेयर लावल्यासारखे वाटते. हे तांत्रिकदृष्ट्या कसे शक्य आहे हे मला माहित नाही, पण या बॅट्स इतक्या खास आहेत की त्या इतर कोणत्याही खेळाडूला साध्या पैशानेही विकत घेता येत नाहीत.
हा फरक केवळ मलाच नाही, तर इतर सर्व आंतरराष्ट्रीय खेळाडूंनाही चांगलाच ठाऊक आहे, असा दावा त्यानं केला. भानुकाच्या या दाव्यामुळे क्रिकेट विश्वात नवी चर्चा सुरु झाली आहे.
( नक्की वाचा : SA vs AFG : 6,6,6...अफगाणिस्तान शेवटपर्यंत लढलं, पण 2 चुकांमुळे झाला घात! डबल सुपर ओव्हरमध्ये लागला निकाल )
चर्चेनंतर सारवासारव
भानुकाच्या या वक्तव्यानंतर सोशल मीडियावर भारतीय खेळाडू बॅट टॅम्परिंग किंवा काही नियमाबाह्य गोष्टी करतात की काय, अशा चर्चांना उधाण आले. मात्र परिस्थितीचे गांभीर्य ओळखून राजपक्षेने तातडीने यावर स्पष्टीकरण दिले आहे. त्याने म्हटले की, त्याच्या बोलण्याचा चुकीचा अर्थ काढला जाऊ नये.
भारतीय क्रिकेट बोर्डाची सिस्टिम, तिथल्या सोयीसुविधा आणि साहित्याचा दर्जा हा जगात सर्वोत्तम आहे. भारतातील बॅट बनवणारे कारागीर अतिशय प्रगत तंत्रज्ञान वापरतात आणि त्या बॅट्सच्या दर्जाचे मी कौतुक करत होतो. हे विधान कोणाचाही अपमान करण्यासाठी नसून भारतीय क्रिकेटच्या प्रगतीबद्दल आदराने केले होते, असे त्याने स्पष्ट केले.
Just a quick clarification! pic.twitter.com/rZbrCyk5iQ
— Bhanuka Rajapaksa (@BhanukaRajapak3) February 10, 2026
वर्ल्ड कपमधील श्रीलंकेची स्थिती
भानुका राजपक्षे त्याच्या वक्तव्यामुळे चर्चेत असला तरी तो स्वतः या वर्ल्ड कपसाठी श्रीलंकन स्क्वॉडमध्ये स्थान मिळवू शकलेला नाही. त्याने आतापर्यंत 45 टी-20 इंटरनॅशनल मॅचेसमध्ये श्रीलंकेचे प्रतिनिधित्व केले आहे. त्याच्या अनुपस्थितीतही श्रीलंकेने वर्ल्ड कपमध्ये विजयी सलामी दिली आहे. आयर्लंड विरुद्धच्या अटीतटीच्या सामन्यात श्रीलंकेने 20 रनने विजय मिळवत स्पर्धेत आपली दावेदारी मजबूत केली आहे. आता राजपक्षेच्या या दाव्यानंतर आयसीसी किंवा भारतीय क्रिकेट बोर्ड यावर काही प्रतिक्रिया देते का, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world