T20 World Cup 2026: टीम इंडिया वर्ल्ड कपच्या सेमी फायनलमध्ये पोहोचली असली तरी अचानक एका मोठ्या संकटानं फॅन्सची झोप उडवली आहे. कोलकातामध्ये वेस्ट इंडिज विरुद्ध झालेल्या सामन्यातील हिरो संजू सॅमसन अडचणी आला आहे. संजू सध्या ज्या फॉर्ममध्ये आहे, ते पाहता तो टीम इंडियासाठी कणा ठरला आहे. वेस्ट इंडिजविरुद्धच्या करो या मरो सामन्यात त्याने नाबाद 97 रनची खेळी करून अशक्य वाटणारा विजय खेचून आणला. पण मॅच संपल्यानंतर त्याने जे काही केलं, त्यामुळे आता त्याच्यावर बंदी येणार का, असा मोठा प्रश्न उपस्थित झाला आहे.
मैदानावर नेमकं काय घडलं?
कोलकाताच्या ईडन गार्डन्सवर 196 रनचा पाठलाग करताना भारताची अवस्था बिकट झाली होती. पण संजूने शेवटपर्यंत हार मानली नाही आणि आपल्या अनुभवाच्या जोरावर टीमला सेमी फायनलचं तिकीट मिळवून दिलं. विजयी रन पूर्ण केल्यानंतर संजूला आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवता आलं नाही. त्याने आनंदाच्या भरात आपलं हेल्मेट हवेत भिरकावलं आणि दोन्ही हात उंचावून देवाचे आभार मानले. दिसायला ही गोष्ट साधी वाटत असली तरी, आयसीसीच्या नियमावलीनुसार हे वर्तन त्याला महागात पडू शकतं.
ICC चा नियम काय?
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद म्हणजेच आयसीसी खेळाडूंच्या मैदानातील वर्तनावर बारीक लक्ष ठेवून असते. आयसीसीच्या कोड ऑफ कंडक्टनुसार, क्रिकेटच्या साहित्याचा चुकीच्या पद्धतीने वापर करणं किंवा ते रागात किंवा चुकीच्या पद्धतीने फेकणं हा गुन्हा मानला जातो. संजूने विजयाच्या उत्साहात हेल्मेट फेकलं असलं, तरी मॅच रेफरी याकडे गांभीर्याने पाहू शकतात. हेल्मेट फेकणं हे 'लेव्हल 1' च्या गुन्ह्यात मोडू शकतं, कारण ते असुरक्षित किंवा खेळाच्या भावनेच्या विरोधात मानलं जातं.