Trending News : सध्या देशभरात लग्नाचा सिझन सुरू आहे. या समारंभात आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण असते, पण काही ठिकाणी होणारे क्षुल्लक वादविवाद माणसाची मानसिकता किती खालच्या स्तरावर जाऊ शकते हे दाखवून देतात. अशीच एक धक्कादायक घटना बिहारमधील बोधगया येथे घडली आहे. इथे एका विवाह समारंभात चक्क रसगुल्ल्यावरून (Rasgulla) तुफान हाणामारी झाली.
या घटनेनंतर वधू पक्षाने लग्नास नकार दिला आणि परिणामी वरातीत आलेल्या नवरदेवाला वधूबरोबर न जाता रिकाम्या हाताने परत जावे लागले. या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
नेमके काय घडले?
या प्रकरणात मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना 29 नोव्हेंबर रोजी बोधगया येथील एका खासगी हॉटेलमध्ये झालेल्या विवाह समारंभात घडली. हथियार नावाच्या गावातून नवरदेव वरात घेऊन आला होता. विवाह सोहळ्यात बुफे काउंटरवर जेवण सुरू असताना,रसगुल्ले कमी पडल्याने वधू आणि वर पक्षाच्या लोकांमध्ये जोरदार बाचाबाची सुरू झाली. पाहता पाहता या शाब्दिक वादाचे रूपांतर हाणामारीत झाले.
सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत आहे की, दोन्हीकडील लोकांनी एकमेकांना लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली. ज्याच्या हाती जे लागले, जसे की खुर्च्या आणि जेवणाचे भांडी, त्याने त्याचा वापर मारहाण करण्यासाठी केला. या हाणामारीत दोन्ही बाजूचे काही लोक जखमी झाले.
( नक्की वाचा : Wedding Night: लग्नाच्या पहिल्या रात्री नवरदेव पळाला आणि 5 दिवसांनी हरिद्वारमध्ये सापडला, कारणही सांगितलं... )
मंडपात गोंधळ आणि लग्नास नकार
या विवाह समारंभात वरमाला (Varmala) आणि इतर अनेक विधी पूर्ण झाले होते. आता फक्त मंडपात बसून मुख्य विधी करणे बाकी होते. परंतु, याच दरम्यान रसगुल्ल्यावरून सुरू झालेल्या वादाने रौद्ररूप धारण केले आणि संपूर्ण समारंभात गोंधळ उडाला.
या मारामारीनंतर वधू पक्षाच्या लोकांनी लग्नास स्पष्टपणे नकार दिला. यामुळे नवरदेवाला वधूला सोबत न घेताच आपली वरात घेऊन परत फिरावे लागले.
वराच्या वडिलांचा आरोप
या घटनेनंतर वराचे वडील महेंद्र प्रसाद यांनी सांगितले की, रसगुल्ल्याच्या कमतरतेमुळे ही मारहाण झाली. मात्र, वधू पक्षाच्या लोकांनी बोधगया पोलीस स्टेशनमध्ये हुंड्याची मागणी केल्याचा खोटा गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा दाखल असूनही, वराच्या बाजूचे लोक वधू पक्षाला लग्नासाठी समजावण्याचा प्रयत्न करत होते, पण वधू पक्षाचे लोक तयार झाले नाहीत.
वराची आई मुन्नी देवी यांनी सांगितले की, मारामारीनंतर दोन्ही पक्षाचे लोक मध्यस्थी करत असताना वधू तिचे दागिने घेऊन निघून गेली. त्यांनी ही माहिती देखील दिली की, हॉटेलची बुकिंग देखील त्यांनीच केली होती. सध्या या सर्व गोंधळाचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे आणि ही घटना एका क्षुल्लक गोष्टीवरून नाती कशी तुटतात हे समोर आलं आहे.
इथे पाहा VIDEO
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world