T20 World Cup: आम्हाला खेळायचं होतं, पण सरकारने नाकारली परवानगी; BCB चा नवीन दावा

बांगलादेशने या स्पर्धेत न खेळण्याचा निर्णय घेतला असून याचा फायदा स्कॉटलंडला मिळाला आहे. आयसीसी क्रमवारीत 14 व्या स्थानावर असलेल्या स्कॉटलंडची या स्पर्धेसाठी एन्ट्री झाली आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
नवी दिल्ली:

येत्या 7 फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या आयसीसी (ICC) पुरुष T20 विश्वचषक 2026 पूर्वी जागतिक क्रिकेटमध्ये एक घडामोड घडली आहे. सुरक्षेचा हवाला देत बांगलादेश सरकारने आपल्या राष्ट्रीय क्रिकेट संघाला भारत दौऱ्यावर जाण्यास परवानगी नाकारली आहे. सरकारच्या या आडमुठ्या भूमिकेमुळे बांगलादेशने या स्पर्धेतून अधिकृतपणे माघार घेतली असून, त्यांच्या जागी आता स्कॉटलंडचा संघ मैदानात उतरणार आहे. विशेष म्हणजे, बांगलादेश क्रिकेट बोर्डाने (BCB) या संपूर्ण वादाचा चेंडू सरकारच्या कोर्टात टोलवला असून, आम्ही खेळण्यास तयार होतो पण सरकारच्या निर्णयापुढे हतबल आहोत, असे स्पष्ट केले आहे. बांगलादेश क्रिकेट बोर्डाचे संचालक अब्दुर रज्जाक यांनी 'आर टीव्ही'शी बोलताना बोर्डाची बाजू मांडली. ते म्हणाले, "आम्ही नेहमीच सांगत आलो आहोत की आमची खेळण्याची इच्छा आहे, मात्र हा पूर्णपणे सरकारचा निर्णय आहे. कोणत्याही परदेश दौऱ्यासाठी आम्हाला सरकारची परवानगी अनिवार्य असते आणि सरकारने यावेळी भारत प्रवासासाठी स्पष्टपणे नकार दिला आहे." बोर्डाच्या या भूमिकेमुळे आता बांगलादेशमधील क्रिकेट प्रेमींमध्ये नाराजी पसरली आहे. 

नक्की वाचा: T20 वर्ल्डकपमध्ये मोठा ट्वीस्ट! ICC चा पीसीबी सोबत संघर्ष, पाकिस्तानला थेट इशारा

बांगलादेश असा का वागला ?

हा विश्वचषक भारत आणि श्रीलंकेत संयुक्तपणे आयोजित केला जाणार आहे. बांगलादेशचे सामने भारतात नियोजित होते. बांगलादेश सरकारने असा दावा केला आहे की, त्यांच्या खेळाडूंना, सपोर्ट स्टाफला आणि माध्यमांना भारतात सुरक्षा मिळण्याबाबत शंका आहे. "भारतात खेळणे आमच्या खेळाडूंसाठी सुरक्षित नाही, असा सरकारचा ठाम समज आहे. त्यामुळेच आम्ही आयसीसीला आमचे सामने श्रीलंकेत हलवण्याची विनंती केली होती," असे बीसीबी मीडिया समितीचे अध्यक्ष अमजद हुसेन यांनी सांगितले. बांगलादेशने त्यांचे सगळे सामने भारतातून श्रीलंकेत हलवण्याची मागणी केली होती, मात्र आयसीसीने ती कडक शब्दांत ही मागणी फेटाळून लावली. आयसीसीने स्वतंत्र सुरक्षा तपासणी केली असता, भारतात बांगलादेश संघासाठी कोणताही धोका नसल्याचे स्पष्ट झाले होते. वेळापत्रक बदलल्यास स्पर्धेच्या स्वरूपावर परिणाम होईल, असे सांगत आयसीसीने बांगलादेशला 24 तासांत निर्णय घेण्यास सांगितले होते. सरकारने आपली भूमिका न बदलल्याने अखेर आयसीसीने बांगलादेशला स्पर्धेतून वगळण्याचा कठोर निर्णय घेतला.

Advertisement

नक्की वाचा: ज्योतिषाचा सल्ला अन् वैष्णवी थेट टीम इंडियात; वाचा नव्या National Crush ची गोष्ट

मुस्तफिजुर रहमानला वगळल्यामुळे बांगलादेश खवळला

बीसीसीआयने कोलकाता नाईट रायडर्सला (KKR) त्यांचा स्टार गोलंदाज मुस्तफिजुर रहमानला रिलीज करण्याच्या सूचना दिल्या होत्या. यानंतर बांगलादेश क्रिकेट बोर्डाने आपले सामने भारताऐवजी श्रीलंकेत खेळवावे अशी मागणी केली होती.  बांगलादेशने या स्पर्धेत न खेळण्याचा निर्णय घेतला असून याचा फायदा स्कॉटलंडला मिळाला आहे. आयसीसी क्रमवारीत 14 व्या स्थानावर असलेल्या स्कॉटलंडची या स्पर्धेसाठी एन्ट्री झाली आहे. नामिबिया, युएई आणि नेपाळ यांसारख्या संघांना मागे टाकत स्कॉटलंड आता वर्ल्ड कपमध्ये आपली ताकद दाखवणार आहे.