इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला खमेनी यांच्या भारतातील मुस्लीम समुदायाबाबत केलेल्या वक्तव्याचा भारताने तीव्र निषेध केला आहे. भारत, गाझा आणि म्यानमारमधील मुस्लीम समुदाय त्रस्त आहे, असे खमेनी यांनी एका निवेदनात म्हटले होते. भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने या वक्तव्याचा निषेध करत म्हटले आहे की, "आम्ही इराणच्या सर्वोच्च नेत्याने भारतातील अल्पसंख्याक समुदायाबद्दल केलेल्या टिप्पणीचा तीव्र विरोध करतो. जे देश इतर देशांतील अल्पसंख्यांकांबद्दल बोलतात त्यांनी आधी स्वतःचे रेकॉर्ड पहावे."
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
ईद-उल-मिलाद नबीच्या निमित्ताने एका एक्स पोस्टमध्ये खमेनी यांनी म्यानमार आणि गाझामधील मुस्लिमांवर अत्याचाराचा आरोप केला होता. त्यांना भारतीय मुस्लिमांशी जोडले होते. त्यानंतर भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने प्रतिक्रिया दिली आहे.
परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी म्हटलं की, भारतातील अल्पसंख्यांकांवर भाष्य करणाऱ्या देशांनी इतरांबद्दल कोणतीही टिप्पणी करण्यापूर्वी त्यांचे रेकॉर्ड तपासले पाहिजेत. इराणच्या सर्वोच्च नेत्याने भारतातील अल्पसंख्यांकांबाबत केलेल्या टिप्पणीचा आम्ही तीव्र निषेध करतो. हे चुकीच्या माहितीवर आधारित आहेत आणि अस्वीकार्य आहेत.
काय म्हणाले इराणचे सर्वोच्च नेते?
इराणच्या नेत्याने X अकाऊंटृवरील आपल्या पोस्टमध्ये म्हटले होते की, "म्यानमार, गाझा, भारत किंवा इतर कोणत्याही ठिकाणी मुस्लिमांना होणाऱ्या त्रासाबद्दल आपण दुर्लक्ष केल्यास आपण स्वतःला मुस्लीम समजू शकत नाही.
इराणच्या नेत्याने भारतातील अल्पसंख्याकांबाबत असे विधान करण्याची ही पहिलीच वेळ नाही. 2019 मध्ये त्यांनी नरेंद्र मोदी सरकारच्या वतीने जम्मू-काश्मीरमधील कलम 370 रद्द करण्याबाबत विधान केले होते. त्यांनी म्हटलं होतं की, काश्मीरमधील मुस्लीमांच्या स्थितीबद्दल आम्हाला चिंता आहे. आमचे भारतासोबत चांगले संबंध आहेत, पण भारत सरकार काश्मीरमधील लोकांशी न्याय्य वागणूक देईल आणि या भागातील मुस्लीमांचे दडपशाही आणि चिरडणे टाळेल अशी आशा आहे.
( नक्की वाचा : Vande Metro : देशातील पहिल्या 'वंदे मेट्रो'चं किती आहे तिकीट? काय आहे वेगळेपण? वाचा संपूर्ण माहिती )
इराण आणि इस्रायल यांच्यातील वाढत्या शत्रुत्वाच्या पार्श्वभूमीवर खमेनी यांनी हे वक्तव्य केलं आहे. भारताचे दोन्ही देशांशी चांगले संबंध आहेत. इराण हा पश्चिम आशियातील कच्च्या तेलाचा सर्वात मोठा पुरवठादार आहे. भारत आणि इराणला पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमधील दहशतवादाबद्दल चिंता आहे. भारत आणि इस्रायल हे दोघेही दहशतवादाने त्रस्त आहेत. त्यामुळेच 7 ऑक्टोबरला हमासच्या दहशतवादी हल्ल्याच्या पहिल्या काही तासांत भारताने इस्रायलला पाठिंबा दिला.