लोकसभा निवडणुकीच्या निकालांपूर्वी पाकिस्तानचं टेन्शन का वाढलंय?

Lok Sabha Elections 2024 : लोकसभा निवडणुकीच्या निकालांपूर्वी पाकिस्तानमध्ये टेन्शन का वाढलंय?

Advertisement
Read Time: 3 mins
लोकसभा निवडणुकींच्या निकालांची पाकिस्तानमध्येही मोठी उत्सुकता आहे.
मुंबई:

लोकसभा निवडणुकीच्या सातही टप्प्यांचं मतदान संपलंय. आता सर्वांना निकालांची प्रतीक्षा आहे. मंगळवारी (4 जून) निकाल जाहीर होतील. देशात कुणाचं सरकार येणार आहे हे मंगळवारी काही तासांमध्ये स्पष्ट होईल. या निकालांची भारतामध्येच नाही तर पाकिस्तानमध्येही मोठी प्रतीक्षा आहे. निवडणूक निकालापूर्वी जाहीर झालेल्या एक्झिट पोलमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा एकदा सत्तेमध्ये येणार असं भाकित व्यक्त करण्यात आला आहे. या एक्झिट पोलनंतर पाकिस्तानचं टेन्शन वाढलंय. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

एक्झिट पोलवर काय प्रतिक्रिया ?

पाकिस्तानचे माजी परराष्ट्र सचिव एजाज चौथरी यांनी सांगितलं की, पंतप्रधान मोदी हे निवडणूक जाहिरनाम्यांची अंमलबजावणी करतात हे त्यांच्या ट्रॅक रेकॉर्डवरुन स्पष्ट होतं. ते पाकिस्तान विरुद्ध आक्रमक धोरण राबवतील. पाकिस्तानमधील प्रमुक वृत्तपत्र डॉननं एक्झिट पोलच्या निष्कर्षांवर शंका उपस्थित केलीय. 'भारतामध्ये एक्झिट पोलचा रेकॉर्ड खराब आहे. निवडणुकींचे निकाल अनेकदा वेगळे असतात. भारतासारख्य विशाल आणि विविधतेनं नटलेल्या देशात निवडणूक निकाल बरोबर येणं हे एक आव्हान आहे,' असं डॉननं म्हंटलंय. 

लोकसभा निवडणुकीचा निकालाची प्रतीक्षा भाजपा आणि विरोधी पक्षांना आहे तितकीच ती पाकिस्तानमध्येही आहे. पाकिस्तानमध्ये या निकालाची प्रतीक्षा का आहे? हा प्रश्न या निमित्तानं साहजिकच उपस्थित राहतो.  

( नक्की वाचा : Exit Polls : गेल्या 2 लोकसभा निवडणुकीत एक्झिट पोलचा काय होता अंदाज ? किती ठरले खरे? )
 

मोदी हरावेत ही पाकिस्तानमध्ये सर्वांची इच्छा

'नरेंद्र मोदी यांचा निवडणुकीत पराभव व्हावा ही पाकिस्तानमध्ये सर्वांचीच इच्छा आहे,' असं मत माजी मंत्री फवाद चौधरी यांनी व्यक्त केलं होतं. चौधरी एवढ्यावरच थांबले नाहीत तर त्यांनी राहुल गांधी आणि अरविंद केजरीवाल यांच्या बाजूनं ट्विट देखील केलं होतं. एक महिन्यापूर्वी चौधरी यांनी 'राहुल ऑन फायर' या कॅप्शनसह राहुल गांधी यांचा एक व्हिडिओ शेअर केला होता. त्यानंतर त्यांनी केजरीवाल यांना पाठिंबा देणारं ट्विट केलं. काँग्रेस आणि केजरीवाल या दोघांनीही या ट्विटशी आपला काही संबंध नसल्याचं स्पष्ट केलं.  

( नक्की वाचा : माधुरी दीक्षितसह अनेक सेलिब्रेटींनी शेअर केलेल्या 'All Eyes On Rafah' फोटोचा अर्थ काय? )
 

काँग्रेससाठी पाकिस्तानमध्ये प्रार्थना

गुजरातमधील एका प्रचारसभेत पंतप्रधान मोदी यांनी पाकिस्तानचा उल्लेख केला होता. 'देशात काँग्रेस कमकुवत होत आहे. सुक्ष्मदर्शकातूनही काँग्रेसला शोधणं अवघड होतंय. त्याबाबत तिकडं पाकिस्तानमध्ये रडारड सुरु आहे. काँग्रेससाठी पाकिस्तानमध्ये प्रार्थना सुरु आहे. शहजाद्यांना पंतप्रधान बनवण्यासाठी पाकिस्तान उतावीळ आहे.' असं मोदींनी सांगितलं होतं. पाकिस्तान आणि विरोधी पक्षाची इच्छा पूर्ण होणार की नाही हे निकालानंतर स्पष्ट होईल. पण, एक्झिट पोल खरा ठरला तर पाकिस्तानला धक्का बसणार हे निश्चित आहे. 

Advertisement

पाकिस्तानला मोदींची भीती का वाटते?

नरेंद्र मोदींनी तिसऱ्यांदा पंतप्रधान व्हावं अशी पाकिस्तानी नेत्यांची इच्छा नाही. पंतप्रधान मोदींनी असं काय केलंय त्यामुळे त्यांना मोदींची भीती वाटते? या प्रश्नाचं उत्तर पाकिस्तानच्या खासदारानं दिलं आहे. भारत पाकिस्तानवर हल्ला करेल, अशी त्यांच्या परराष्ट्र मंत्र्यांना भीती होती, अशी कबुली या खासदारनं दिली होती. मोदी सरकारच्या कार्यकाळातच भारतीय लष्करानं पाकिस्तान तसंच पाकव्याप्त काश्मीरमध्ये सर्जिकल स्ट्राईक केला होता. 

( नक्की वाचा : भारताजवळ नवा देश तयार करण्याचा अमेरिकेचा प्लॅन? )
 

पुलवामामध्ये CRPF च्या ताफ्यावर झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा भारतानं बदला घेतला. भारतानं पाकिस्तानमध्ये घुसून हल्ला केला. भारतीय एअर फोर्सनं केलेल्या सर्जिकल स्ट्राईकमध्ये 300 पेक्षा जास्त दहशतवादी मारले गेले  होते. पाकिस्ताननं आजवर या प्रकारच्या हल्ल्याचा इन्कार केलाय. पण, मोदी सरकारच्या राजवटीत भारत चोख उत्तर देतो, हे माहिती असल्यानंच पाकिस्तानी नेत्यांची मोदी सरकार पुन्हा सत्तेमध्ये येऊ नये, ही इच्छा आहे. 

Advertisement

काश्मीरमधील शांततेची पाकिस्तानमध्ये अस्वस्थता

भारत आणि पाकिस्तान यांच्यात काश्मीर हा प्रमुख वादाचा मुद्दा आहे.  जम्मू काश्मीरमधील दहशतवाद्यांना पाकिस्ताननं नेहमीच पाठबळ दिलं आहे. पण, गेल्या काही वर्षात काश्मीरमधील परिस्थिती बदललीय. काश्मीरमध्ये झालेलं मोठ्या प्रमाणात मतदान हे याचं उदाहरण आहे. काश्मीरमधील 370 कलम हटवल्यानंतरची ही पहिली निवडणूक होती. जम्मू काश्मीरमधील पाच मतदारसंघामध्ये जवळपास 58.46 टक्के मतदान झालं. गेल्या 35 वर्षात जम्मू काश्मीरमध्ये झालेलं हे सर्वाधिक मतदान आहे. 

मोदी सरकारच्या कार्यकाळात जम्मू काश्मीरमधील बदललेल्या या परिस्थितीमुळेही पाकिस्तानमध्ये अस्वस्थता आहे.