Meta Layoffs 2026: तंत्रज्ञान क्षेत्रातील बलाढ्य कंपनी असलेल्या 'मेटा' नं त्यांच्या एकूण कर्मचारी संख्येच्या सुमारे 10 टक्के म्हणजेच तब्बल 8,000 कर्मचाऱ्यांना तडकाफडकी कामावरून काढून टाकलं आहे. विशेष म्हणजे, ही कपात करताना कंपनीनं कर्मचाऱ्यांना आधी घरातून काम (Work From Home) करण्याच्या सूचना दिल्या आणि त्यानंतर पहाटेच्या वेळी ई-मेल पाठवून ही धक्कादायक माहिती दिली.
पहाटे 4 वाजता आला तो ई-मेल
मेटा कंपनीनं कर्मचारी कपातीचा हा नवा टप्पा अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने पार पाडला. सिंगापूरमधील कर्मचाऱ्यांना पहाटे 4 वाजता, तर भारतीय वेळेनुसार पहाटे 1:30 वाजता नोकरीवरून काढल्याचे ई-मेल प्राप्त झाले. कार्यालयामध्ये कर्मचाऱ्यांचा गोंधळ किंवा संताप दिसू नये, यासाठी कंपनीनं सर्वांना ऑफिसला न येता घरातूनच काम करण्यास सांगितले होते.
( नक्की वाचा : वांद्र्यात अवैध वस्ती वाचवण्यासाठी पोलिसांवर थेट हल्ला, जमावाला पांगवण्यासाठी पोलीस आक्रमक, नेमकं काय घडतंय? )
काय आहे कारण?
कंपनीनं या कपातीचं मुख्य कारण कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात एआयला (AI) दिलेले प्राधान्य हे सांगितले आहे. मेटा आता 'एआय-नेटिव्ह' टीम्स तयार करण्यावर भर देत असून, सुमारे 7,000 कर्मचाऱ्यांच्या जबाबदाऱ्या बदलण्यात येणार आहेत. तसेच 6,000 रिक्त पदांची भरती प्रक्रियाही थांबवण्यात आली आहे. कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी मार्क झकरबर्ग यांनी एआयला सर्वोच्च प्राधान्य दिले असून, यावर्षी या तंत्रज्ञानावर 125 ते 145 अब्ज डॉलर्स खर्च करण्याची योजना आहे.
ऑफिसमधील तणाव आणि कर्मचाऱ्यांचा विरोध
या कपातीची कुणकुण लागल्यापासून कर्मचाऱ्यांमध्ये प्रचंड अस्वस्थता होती. काही कर्मचाऱ्यांनी तर कंपनी सोडण्यापूर्वी ऑफिसमधील मोफत स्नॅक्स आणि चार्जर गोळा करण्यास सुरुवात केल्याचेही समोर आले आहे. त्यातच कंपनीनं कर्मचाऱ्यांच्या माऊसच्या हालचालींवर लक्ष ठेवणारे नवीन टूल आणल्यानं 1,000 पेक्षा जास्त कर्मचाऱ्यांनी या पाळत ठेवण्याच्या प्रकाराला विरोध दर्शवला आहे.
तंत्रज्ञान क्षेत्रातील मोठी पडझड
नोकरी कपातीचा हा कल केवळ मेटापुरता मर्यादित नाही. गेल्या आठवड्यात सिस्को सिस्टम्सनं 4,000 नोकऱ्या कमी केल्या. याशिवाय मायक्रोसॉफ्ट, ॲमेझॉन, डिस्ने आणि ओरॅकल यांसारख्या दिग्गज कंपन्यांनीही मोठ्या प्रमाणावर कर्मचारी कपात केली आहे. ओरॅकलने तर जगभरातील 20,000 ते 30,000 कर्मचाऱ्यांना अशाच प्रकारे पहाटे ई-मेल पाठवून कामावरून कमी केले होते.
नव्या युगासाठी कौशल्यांची गरज
रेडू क्यूचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपल दत्ता यांच्या मते, हा बदल तात्पुरता नसून तंत्रज्ञान क्षेत्रातील एक मोठी रचनात्मक फेररचना आहे. आता कंपन्यांना केवळ कामाची अंमलबजावणी करणाऱ्यांची गरज नसून, एआय आणि जटिल प्रणालींचे संचालन करू शकतील अशा तज्ज्ञांची आवश्यकता आहे. भविष्य अशा व्यावसायिकांचे आहे जे एआय युगातील आव्हाने स्वीकारून नवीन तंत्रज्ञानाशी जुळवून घेतील.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world