India Pakistan Relation: पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संबंधात तणाव निर्माण झाला आहे. या संघर्षासोबतच, दोन्ही देशांनी एकमेकांवर कठोर निर्बंध लादले आहेत.
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने सिंधू जल करार (Indus Water Treaty) रद्द केला आहे. भारताच्या या निर्णयामुळे पाकिस्तान चांगलाच संकटात सापडला आहे. याच प्रयत्नांच्या अंतर्गत, पाकिस्तानने गेल्या काही दिवसांत भारताला एकपाठोपाठ चार पत्रे लिहिली आहेत. या सर्व पत्रांचा मुख्य उद्देश हाच आहे की, सिंधू जल करार थांबवण्याच्या निर्णयावर भारताने पुन्हा विचार करावा.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
भारताची भूमिका काय?
'ऑपरेशन सिंदूर' नंतरही पाकिस्तानने लिहिलेल्या पत्रात भारताला सिंधू जल करार निलंबित करण्याच्या निर्णयाचा फेरविचार करण्याची विनंती केली होती. मात्र, भारताने पाकिस्तानची ही विनंती फेटाळून लावली. भारताने स्पष्ट केले की, 'व्यापार आणि दहशतवाद एकत्र चालू शकत नाहीत आणि पाणी आणि रक्त एकत्र वाहू शकत नाही.' पाकिस्तानने सिंधू जल करारातील अटींचे उल्लंघन केले आहे, असंही भारतानं स्पष्ट केलं आहे.
हा करार सद्भावना आणि मैत्रीच्या आधारावर करण्यात आला होता. परंतु, पाकिस्तानने सीमापार दहशतवादाला प्रोत्साहन देऊन या कराराच्या मूळ भावनेच्या विरोधात काम केले आहे. भारताच्या या निर्णयावर जागतिक बँकेने (World Bank) हस्तक्षेप करण्यास नकार दिला आहे.
( नक्की वाचा : भारताचा जल प्रहार : वाढता उन्हाळा, सिंधूमधील पाणी कमी, पाकिस्तानवर येणार भयंकर संकट! )
पाकिस्तानात भीषण संकटाची शक्यता
सूत्रांनुसार, सिंधू जल कराराची अंमलबजावणी न करण्याच्या भारताच्या निर्णयामुळे पाकिस्तानमध्ये गंभीर संकट निर्माण होण्याची शक्यता आहे. या अंदाजानुसार, पाकिस्तानमधील रब्बी पिकांचे मोठे नुकसान होऊ शकते. याव्यतिरिक्त, पिण्याच्या पाण्याची समस्या निर्माण झाल्याने सामान्य जनजीवन विस्कळीत होऊ शकते. पण, याबाबत व्यक्त करण्यात आलेल्या अंदाजानुसार, खरीप पिकांवर जास्त प्रतिकूल परिणाम होणार नाही.