- अजित पवारांचा विमान अपघातात मृत्यू झाला असून त्यांच्या अंत्यसंस्कारासाठी बारामतीत तयारी सुरू आहे
- काँग्रेस नेते नितीन राऊत यांनी अपघातामागे घातपात असल्याची शंका व्यक्त करून चौकशीची मागणी केली आहे
- राऊत म्हणाले की विमानाची तांत्रिक तपासणी झाली आहे की नाही आणि विमान कोणत्या कंपनीचे होते हे तपासले पाहिजे
अजित पवारांचा विमान अपघातात मृत्यू झाला आहे. त्यांच्यावर उद्या गुरूवारी बारामतीतच अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. त्याची तयारी ही सुरू झाली आहे. देशभरातून मोठे नेते, राष्ट्रवादीचे कार्यकर्ते, मंत्री, आमदार, खासदार हे बारामतीकडे निघाले आहेत. या अपघातानंतर सर्वांनाच धक्का बसला आहे. त्यानंतर हा अपघात आहे की घातपात याची चर्चा सुरू झाली आहे. काँग्रेसच्या एका बड्या नेत्याने या अपघाताबाबत शंका उपस्थित करत याची चौकशी करण्याची मागणी केली आहे. या अपघातामागे घातपाताची शंका त्यांनी उपस्थित केली आहे.
काँग्रेस नेते आणि माजी मंत्री नितीन राऊत यांनी या अपघाताबाबत शंका उपस्थित केली आहे. ते म्हणाले की हे विमान कोणत्या कपनीचे होते. त्याचे मॉडेल काय होतं? विमानाची उड्डाणा आधी तपासणी झाली होती का? असे अनेक प्रश्न निर्माण होत असल्याचं त्यांनी सांगितलं. अजित पवार हे ज्या उंचीचे नेते आहेत अशा स्थिती या सर्व गोष्टीची तपासणी होणे गरजेचे असल्याचं ही त्यांनी सांगितले. नेते अनेक सभा घेता याव्यात यासाठी विमान किंवा हेलिकॉप्टर प्रवास करत असतात. त्याना घाई असते. अशा वेळी ही घटना घडली तर त्याची चौकशी झालीच पाहीजे असं राऊत म्हणाले.
त्यांनी टेक्निकल ऑडीट प्रश्न ही उपस्थित केला आहे. प्रत्येकाचं टेक्निकल ऑडीट झालं पाहीजे असं ही ते म्हणाले. हा अपघात ज्या पद्धतीने झाला आहे त्याबाबत आपल्या मनात शंका आहे असं ही ते म्हणाले. निवडणुकीत एकमेकांवर ताशेरे ओढले गेले. छोटे पक्ष संपवण्याची गोष्ट केली जावू लागली. ते सर्व पाहात या घटनेची चौकशी झाली पाहिजे असं ही ते म्हणाले. राऊत यांनी आपल्या मनातली शंका बोलून दाखवली आहे. त्यामुळे हा अपघात की घातपात याची चर्चा सुरू झाली आहे. शिवाय राऊत यांनी या पुढच्या काळात नेत्यांनी विमान किंवा हेलिकॉप्टर प्रवास प्रचारा दरम्यान करावा की नाही याबाबत प्रश्न निर्माण केला आहे.
दरम्यान नितीन राऊत यांच्या शंकेनंतर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी शंका उपस्थित केली आहे. त्यांनी तर अजित पवार हे भाजपची साथ येणाऱ्या काळात सोडणार होते असं वक्तव्य करून खळबळ उडवून दिली आहे. त्यानंतर हा अपघात झाला आहे. त्यामुळे याची चौकशी झाली पाहीजे असं ही त्या यावेळी म्हणाल्या. तर उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी ही या अपघाताच्या चौकशीची मागणी केली आहे. देशातल्या काही नेत्यांनी याबाबत शंका उपस्थित केल्यामुळे नक्की काय घडलं आहे हे समोर आलं पाहीजे अशी मागणी कार्यकर्तेही करत आहेत.