अमरावती जिल्ह्यात मे महिन्याच्या 28 दिवसांमध्ये 22 दिवस अवकाळी व मान्सूनपूर्व पाऊस झाला. मात्र असं असताना सुद्धा अमरावतीच्या मेळघाटमध्ये भीषण पाणीटंचाई आहे. 11 गावात तब्बल वीस टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाच्या व सरकारच्या पाणीपुरवठा योजना या ठिकाणी कुचकामी ठरत असल्याचे पाहायला मिळतेय.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
राज्यासह अमरावतीमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे, मात्र तरी देखील मेळघाटमध्ये घोटभर पिण्याच्या पाण्यासाठी आदिवासी बांधवांची धडपड सुरू आहे. मेळघाटमधील खडीमल गावी भीषण परिस्थिती आहे. येथे जीव धोक्यात टाकून विहिरीवर पाणी भरण्यासाठी महिलांची तुफान अशी गर्दी दिसून येत आहे, गावात टँकर येतो. टँकरद्वारे पाणी विहिरीत टाकल जातं व विहिरीमधलं पाणी उपसण्यासाठी अख्या गावातील महिला एकत्र येऊन या ठिकाणी पिण्याच्या पाण्यासाठी गर्दी करतात. खडीमल गावात अद्याप महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाची पाणीपुरवठा योजना पूर्णत्वास गेली नाही. देशाला स्वातंत्र्य होऊन 70 वर्षाचा काळ लोटला. मात्र तरी देखील या ठिकाणी आदिवासींना पिण्याचे पाणी मिळत नाही.
नक्की वाचा - Fishermen News: मच्छीमारांसाठी राज्य सहकारी बँकेची 1000 कोटींची तरतूद, महिला मच्छीमारांना होणार फायदा
या संपूर्ण पाणीटंचाईवर अमरावती जिल्हा परिषदेने प्रतिक्रिया दिली. मेळघाटातील 11 गावामध्ये अमरावती जिल्हा परिषदेमार्फत 20 टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. मे महिन्यात या ठिकाणी पाण्याची पूर्णपणे स्त्रोत आटले आहे, तर महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागातर्फे प्रादेशिक नळ योजनेचे काम सुरू आहे. त्यामुळे पुढच्या वर्षी येथील काम पूर्ण होऊन कायमची पाणीटंचाई मिटणार असा दावा जिल्हा परिषदेच्या अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी प्रिया देशमुख यांनी केला आहे. मोठा गावातील वैशाली जावंडे यांनी सांगितलं की, दररोज तीन ते चार तास पाणी भरण्यासाठी जातो. उन्हाळ्यात व पावसाळ्यात दोन्ही ऋतूमध्ये आम्हाला पाणीटंचाईची झळ भासते. प्रशासन याकडे लक्ष देत नाही असा आरोप त्यांनी केला आहे.
चिखलदरा तालुक्यातील मोथा गावातील स्थानिक महिला सांगतात की, याच गावात आमचा जन्म झाला. याच गावात लग्न झालं तरी देखील आम्हाला पिण्याच्या पाण्यासाठी आजही झगडावं लागतं. सकाळपासून पाणी भरण्यासाठी विहिरीवर जावं लागतं. पाण्यासाठी अद्याप प्रशासनाचे सहकार्य नाही, असा आरोप या महिलांनी केला. तर खडीमल गावात सर्वाधिक पाणीटंचाई असून या ठिकाणी दूषित पाणीपुरवठा होत आहे, असा आरोप नागरिकांनी केला आहे.