- अमृता फडणवीस यांनी ५ ते ७ किलोमीटरच्या अंतराचे काम सायकलने करण्याचा संकल्प केला आहे
- अमृता फडणवीस यांनी पेट्रोल बचतीसाठी सायकल चालवण्याचा उपक्रम सोशल मीडियावर शेअर केला
- जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमती वाढल्याने देशात पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ झाली आहे
देशात पेट्रोल आणि डिझेलचे दर गगनाला भिडले आहेत. त्यात सोशल मीडियावर एका व्हिडिओने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस या चक्क रस्त्यावर सायकल चालवताना दिसल्या. त्यांनी केवळ सायकल चालवली नाही, तर या माध्यमातून त्यांनी नागरिकांना एक मोठा संदेशही दिला आहे. अमृता फडणवीस यांनी आता एक महत्त्वाचा संकल्प केला आहे. त्या आता 5 ते 7 किलोमीटरच्या परिघातील सर्व कामे कारऐवजी सायकलनेच पूर्ण करणार असल्याचे जाहीर केले आहे.
अमृता फडणवीस सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असतात. त्यांना फॉलो करणाऱ्यांची संख्या ही मोठी आहे. त्यांनी स्वतः या अनोख्या उपक्रमाची माहिती दिली आहे. पेट्रोलची बचत करण्यासाठी हा आपला एक छोटासा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले. सायकल चालवल्याने केवळ इंधनाचीच बचत होत नाही, तर आरोग्यही उत्तम राहते, असं ही त्या म्हणाल्या. त्यातून व्यायाम ही होतो असं त्यांनी सांगितलं. सध्या जागतिक बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या किमती प्रति बॅरल 100 डॉलरच्या जवळ पोहोचल्या आहेत. देशातही तेल कंपन्यांनी दर वाढवले आहेत. अशा काळात अमृता फडणवीस यांचे हे पाऊल महत्त्वपूर्ण मानले जात आहे.
अमृता फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आवाहन केल्यानंतर हे पाऊल उचलले आहे. पीएम मोदींनी परदेश दौरे टाळण्याचे आवाहन केले होते, तेव्हा अमृता फडणवीस यांनी आपला आखाती देशांचा (खाडी देश) दौरा त्वरित रद्द केला होता. देशहितापेक्षा मोठे काहीही नाही, अशी भावना त्यांनी तेव्हा व्यक्त केली होती. आता इंधन बचतीच्या मोहिमेतही त्या आघाडीवर दिसत आहेत. महागाईच्या या काळात त्यांच्या या साधेपणाची आणि सायकलवारीची सर्वत्र चर्चा रंगली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही इंधन बचतीसाठी वर्षा बंगला ते मंत्रालय बाईकने प्रवास केला होता. शिवाय महाराष्ट्रातील दौरे ही ते ट्रेनने करत असल्याचं पाहायला मिळालं आहे. त्यानंतर आता अमृता फडणवीस ही सायकल चालवताना दिसल्या आहेत. शिवाय त्यांनी पाच ते सात किलोमिटर परिघात असलेली कामे सायकलनेच करणार असल्याचं जाहीर केलं आहे. खास करून त्याचं सर्वत्र कौतूक होत आहे. त्यांनी उचलेलं हे पाऊल उतरांनी ही उचलावं अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.