Yatri Mitra App : ओबा, उबर यांच्या मक्तेदारीला सुरुंग लागवण्यासाठी ऑटो रिक्षा संघटनांनी तयारी केली आहे . ओला, उबर सारख्या अॅप्समुळे अनेक रिक्षा चालकांना फटका बसतो आहे. तसेच प्रवाशांना देखील ऑनलाईन अॅप्सद्वारे रिक्षा, टॅक्सी बुकिंग करुन प्रवास करणे सोपे वाटते. त्यामुळे प्रवाशांची गरज आणि आपलं आर्थिक नुकसान टाळण्यासाठी ऑटोरिक्षा चालक संघटनेने एक नवीन राइड अॅप सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या 15 जुलै रोजी हे अॅप लाँच होण्याची शक्यता आहे.
(नक्की वाचा- ठाणे–बोरीवली प्रवास अवघ्या 15 मिनिटांत, मुख्यमंत्र्यांनी दिली गुड न्यूज! वाचा सर्व अपडेट)
‘Yatri Mitra' नावाच्या अॅपची सध्या बीटा टप्प्यात चाचणी सुरू आहे. अॅप लाइव्ह झाल्यानंतर प्रवासी याद्वारे राइड बुक करू शकतील आणि इलेक्ट्रॉनिक मीटरवरील रीडिंगनुसार पैसे देऊ शकतील. हिंदुस्थान टाईम्सने याबाबतचं वृत्त प्रसिद्ध केले आहे. यात्री मित्र अॅपची सुविधा सुरुवातीला मुंबई आणि ठाणे येथे सुरू केली जाईल. त्यांतर हळूहळू मुंबई महानगर प्रदेशाच्या इतर भागांमध्ये विस्तारित केली जाईल. लाँचच्या वेळी किमान 10 हजार ऑटो नोंदणीकृत होण्याची अपेक्षा आहे, असं सूत्रांचा म्हणणं आहे.
मुंबई आणि ठाण्यातील ऑटोरिक्षा चालकांशी संवाद साधला तेव्हा त्यांनी मीटर-आधारित पेमेंट सुलभ करू शकणाऱ्या अॅपची गरज त्यांनी व्यक्त केली होती. ज्यामुळे प्रवासी आणि चालक दोघांनाही फायदा होईल, असं एका युनियन पदाधिकाऱ्याने सांगितलं.
मेटाझेन लॅब्स प्रायव्हेट लिमिटेडकडून अॅपची निर्मिती
यात्री मित्र अॅप मेटाझेन लॅब्स प्रायव्हेट लिमिटेडने विकसित केले आहे, ज्याने आयकर विभाग, मुंबई पोर्ट ट्रस्ट, ठाणे महानगरपालिका आणि रोटरी इंटरनॅशनलसह इतरांसाठी अॅप्स तयार केले आहेत. हे मेटाझेन आणि सेवा सारथी युनियन संयुक्तपणे चालवतील, अशीही माहिती सूत्रांकडून मिळत आहे.
( नक्की वाचा : Pune Metro : पुणेकरांचा प्रवास होणार आणखी फास्ट, मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्याला केंद्र सरकारची मंजुरी )
रिक्षा चालकांना किती खर्च येणार?
उबर आणि ओलासारखे अॅप्स चालकांकडून भाड्याच्या बदल्या मोठ्या प्रमाणात कमिशन घेतात. परंतु 'यात्री मित्र' अॅप वापरणाऱ्या ड्रायव्हर्सना दररोज 25 इतके नाममात्र शुल्क द्यावे लागेल. याशिवाय नियमितपणे अॅप वापरणाऱ्यांना वैयक्तिक अपघात विमा संरक्षण देखील मिळणार असल्याचं, मेटाझेन लॅब्सचे संचालक नरेंद्र राव यांनी सांगितलं. प्रवाशांकडून मीटरनुसार भाडे आकारले जाईल आणि रोख किंवा UPI द्वारे पैसे दिले जाऊ शकतात, असंही राव म्हणाले.