स्वप्नाली सपकाळे, बदलापूर
बदलापूर शहरात रिक्षा प्रवासासाठी आकारले जाणारे अवाजवी भाडे आणि रिक्षा चालकांची मनमानी आता वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. "बदलापूर शहरात रिक्षा मीटरप्रमाणेच चालल्या पाहिजेत, कोणतीही मनमानी दरवाढ खपवून घेतली जाणार नाही," असा इशारा भाजप नेते मिलिंद धारवाडकर यांनी दिला आहे. यामुळे शहरातील रिक्षा प्रवासाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
रिक्षाचालकांकडून नियमांची पायमल्ली
आरटीओने (RTO) बदलापूर शहरासाठी रिक्षा दराबाबत स्पष्ट मार्गदर्शक सूचना दिलेल्या आहेत. आरटीओच्या नियमानुसार, पहिल्या 1 किलोमीटरसाठी साधारणतः 12 रुपये दर आकारणे अपेक्षित आहे. प्रत्यक्षात अनेक रिक्षा चालक मीटर न लावता प्रति सीट चक्क 20 रुपये वसूल करत आहेत. याचा अर्थ, एका रिक्षामध्ये 3 प्रवासी बसल्यास रिक्षा चालकाला 60 रुपये मिळत आहेत, जे अधिकृत दरापेक्षा कितीतरी जास्त आहे.
(नक्की वाचा- Dombivali News : ठाणे-डोंबिवलीतील मानकोली उड्डाणपुलावर नागरिकांच्या जीवाशी खेळ; भाजप नेत्याने शेअर केला Video)
कुणाला बसतोय फटका?
या अनधिकृत भाडेवाढीचा थेट परिणाम बदलापूरमधील मध्यमवर्गीय आणि कष्टकरी वर्गावर होत आहे. दररोज कामावर जाणाऱ्या कामगारांच्या मासिक बजेटवर याचा मोठा ताण पडत आहे. शाळा-महाविद्यालयात जाणाऱ्या विद्यार्थ्यांकडूनही अशाच प्रकारे वसुली केली जात आहे. खरेदीसाठी किंवा डॉक्टरांकडे जाणाऱ्या नागरिकांनाही हा आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे.
प्रशासनाकडे कारवाईची मागणी
मिलिंद धारवाडकर यांनी स्थानिक प्रशासन आणि आरटीओ विभागाला या प्रकरणात तात्काळ लक्ष घालण्याचे आवाहन केले आहे. "सर्वसामान्यांवर होणारा हा अन्याय थांबवणे गरजेचे आहे. जर आरटीओचे आदेश असतील, तर त्यांची अंमलबजावणी का होत नाही?" असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. आरटीओने शहरात विशेष पथके नेमून अशा मुजोर रिक्षा चालकांवर दंडात्मक कारवाई करावी, अशी मागणी जोर धरत आहे.