Bandra News: मुंबईतील वांद्रे पूर्व भागातील गरीबनगर भागात अतिक्रमण हटवण्याच्या मोहिमेदरम्यान सलग दुसऱ्या दिवशी मोठा राडा झाला. रेल्वे रुळाला लागून असलेल्या अवैध वस्त्यांवर कारवाई करण्यासाठी गेलेल्या पथकावर स्थानिक नागरिकांनी हिंसक हल्ला केला. नागरिकांनी प्रशासनाच्या दिशेनं बादल्या, घरातील वस्तू आणि पाणी फेकून मारल्यानं परिस्थिती तणावपूर्ण बनली. अखेर या आक्रमक जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी बळाचा वापर करत लाठीमार केला.
वांद्रे पूर्व भागात अनधिकृत घरांचं मोठं जाळं पसरलं असून तिथे चक्क 4 मजली इमारती आणि मोबाईल टॉवरही उभारण्यात आले होते. पालिकेनं यापूर्वी नोटीस देऊनही ही घरं रिकामी करण्यात आली नव्हती, त्यामुळे प्रशासनाला ही तोडक कारवाई करावी लागली. या कारवाईत अनधिकृत धार्मिक स्थळांचाही समावेश असून 2 दिवसांत झोपडपट्टीमधील 500 घरं तोडण्याचं प्रशासनाचं नियोजन आहे. मात्र, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार 100 घरांना संरक्षण मिळाल्यामुळे ती सध्या तोडली जाणार नाहीत.

अतिरिक्त रेल्वे टर्मिनसची गरज
मुंबई महानगर क्षेत्रात मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गांवर सुमारे 50 जादा लांब पल्ल्याच्या गाड्या सुरू करण्याची रेल्वेची योजना आहे. प्रवाशांची वाढती गर्दी पाहता मुंबईत अतिरिक्त टर्मिनल स्टेशन्स आणि अधिक प्लॅटफॉर्मची अत्यंत आवश्यकता निर्माण झाली आहे.
( नक्की वाचा : Kalyan News: बैठक सुरू झाली अन् अचानक 60 - 70 जण घुसले; कल्याणमध्ये ठाकरे गटाच्या शाखेत जोरदार राडा )
वांद्रे टर्मिनसचा होणार विस्तार
या मोहिमेतून मोकळी होणारी जागा प्रामुख्याने वांद्रे टर्मिनस येथील डिझेल शेड हलवण्यासाठी वापरली जाईल.
डिझेल शेड स्थलांतरित झाल्यानंतर त्या जागी टर्मिनसचा विस्तार करण्यात येईल.
सात प्लॅटफॉर्मच्या पुढे नवीन प्लॅटफॉर्म उभारले जाणार असून यामुळे गाड्यांची क्षमता वाढणार आहे.
ही संपूर्ण तोडक कारवाई 19 मे ते 23 मे अशा एकूण 5 दिवसांच्या कालावधीत पूर्ण केली जाणार आहे.
इथे पाहा Video
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world