ऋतिक गणकवार, प्रतिनिधी
Mumbai Bank Jihad case : नाशिकमधील कॉर्पोरेट जिहादच्या घटनेने राज्य हादरलेलं असतानाच आता देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईतून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मुंबईतील एका अत्यंत प्रतिष्ठित आणि मोठ्या बँकेत 'बँक जिहाद' सुरू असल्याचा खळबळजनक दावा एका पीडित पतीने केला आहे. नरिमन पॉईंट सारख्या उच्चभ्रू परिसरात असलेल्या बँकेच्या शाखेत हा सर्व प्रकार घडल्याचं समोर आल्यानं खळबळ माजली आहे. या प्रकरणाने आता कॉर्पोरेट क्षेत्रातील धर्मांतराच्या मुद्द्याला पुन्हा एकदा तोंड फोडलं आहे.
काय आहे प्रकरण?
मुंबईतील या बड्या बँकेत कार्यरत असलेल्या एका महिला कर्मचाऱ्याचे धर्मांतर करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप तिच्या पतीने केला आहे. पीडित पतीने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या काही दिवसांपासून त्याच्या पत्नीच्या वागण्यात अचानक मोठा बदल झाला होता. ती इस्लाम धर्माकडे वळली असून त्या धर्मातील चालीरीतींचे पालन करू लागली होती. इतकंच नाही तर तिनं स्वतःसोबतच आपल्या 8 वर्षांच्या चिमुरड्या मुलीचंही धर्मांतर करण्याची इच्छा बोलून दाखवली होती. यामुळे कुटुंबावर कोसळलेल्या या संकटामुळे पती प्रचंड मानसिक तणावाखाली आहे.
( नक्की वाचा : Pune News : पुण्यातील सारसबाग 2 दिवस बंद, महापौरांची मोठी घोषणा! प्रशासनाच्या निर्णयाची चर्चा का? )
बँकेतील सहकाऱ्यावर आरोप
या संपूर्ण प्रकरणाच्या मुळाशी बँकेतीलच काही कर्मचारी असल्याचा गंभीर दावा पतीने केला आहे. पत्नीचे बँकेतील एका सहकाऱ्यासोबत संबंध असून त्याच व्यक्तीनं तिच्यावर इस्लाम स्वीकारण्यासाठी दबाव किंवा प्रभाव टाकल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. पतीने पत्रात स्पष्ट केल्यानुसार, हा केवळ प्रेमाचा भाग नसून एका मोठ्या सिंडिकेटचा कट आहे. हिंदू महिलांना आर्थिक आणि शारीरिकदृष्ट्या जाळ्यात ओढून त्यांचं धर्मांतर करणं हा यामागचा मोठा अजेंडा असल्याचं पतीने आपल्या पत्रात म्हटलं आहे.
आर्थिक शोषण आणि कर्जाचा सापळा
या प्रकरणातील धक्कादायक बाब म्हणजे, पीडित महिलेचं केवळ मानसिक परिवर्तन करण्यात आलं नाही, तर तिचं आर्थिक शोषणही करण्यात आल्याचा आरोप आहे. यापूर्वी एका अन्य कर्मचाऱ्याने तिच्यावर दबाव टाकून बँकेतून कर्ज काढायला लावलं होतं आणि त्या कर्जाची मोठी रक्कम संबंधित व्यक्तीच्या खात्यावर वळवण्यात आली होती. अशा प्रकारे एका सुशिक्षित आणि जबाबदार पदावर असलेल्या महिलेला पद्धतशीरपणे जाळ्यात अडकवून तिला धर्मांतराच्या उंबरठ्यावर उभं केलं गेल्याचा दावा या तक्रारीत करण्यात आला आहे.
( नक्की वाचा : Bakrid 2026: मक्का-मदीना असलेल्या देशात कुर्बानीचे नियम काय सांगतात? सौदीच्या निर्णयाची सध्या भारतात चर्चा का? )
राजस्थानमधून पत्नी आणि मुलगी बेपत्ता
प्रकरण हाताबाहेर जात असल्याचं लक्षात येताच पतीने आपल्या पत्नीला आणि मुलीला राजस्थानमधील उदयपूर येथील मूळ गावी नेलं होतं. मात्र, तिथेही या जिहादी प्रवृत्तीचा पाठलाग थांबला नाही. 18 एप्रिल 2026 रोजी पहाटेच्या सुमारास पत्नी आणि मुलगी अचानक गायब झाल्याचं समोर आलं आहे. संबंधित बँकेचा कर्मचारी त्यांना तिथून घेऊन गेल्याचा संशय पतीला आहे. याप्रकरणी उदयपूरमधील सुखेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून सध्या पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.
बँक प्रशासनाचं मौन आणि पतीची मागणी
या संपूर्ण गंभीर प्रकाराबाबत जेव्हा संबंधित बँकेच्या प्रशासनाकडे विचारणा करण्यात आली, तेव्हा त्यांनी यावर कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया देण्यास नकार दिला. दरम्यान, पीडित पतीने या प्रकरणाची तक्रार पत्राद्वारे बँकेच्या वरिष्ठ व्यवस्थापनाकडे केली आहे. आपल्या पत्नीची तातडीने उदयपूर किंवा आसपासच्या परिसरात बदली करण्यात यावी, जेणेकरून तिला या जाळ्यातून बाहेर काढता येईल, अशी विनंती पतीने केली आहे. मुंबईत घडलेल्या या प्रकारामुळे आता कॉर्पोरेट विश्वात महिलांच्या सुरक्षिततेचा आणि वाढत्या धर्मांतराचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world