Raj Thackeray Uddhav Thackeray Reunion: मराठीच्या मुद्द्यावर एकत्र आलेल्या राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या विजयी मेळावा आज पार पडला. राज आणि उद्धव ठाकरे यांच्या भाषणावर भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी निशाणा साधला आहे. "म मराठीचा नाहीच… सत्तेचाच" अशा शब्दात केशव उपाध्ये यांनी टीका केली आहे.
केशव उपाध्ये यांनी ट्वीट करत म्हटलं की, "गेले अनेक दिवस दोन भाऊ एकत्र येणार… म्हणून सुरू असलेला अंक एकदाचा आज उघडला… आणि या दोघांकडून अपेक्षा असणाऱ्याच्या मनांत निराशाच आली. कारण मराठी, मराठी भाषा याबद्दल काय होतं या कार्यक्रमात?"
(नक्की वाचा - आमच्या दोघांमधील अंतरपाट अनाजीपंतांनी दूर केला'; उद्धव ठाकरेंचाही फडणवीसांवर निशाणा)
"वाजत गाजत दोन्ही भाषण झाली पण या भाषणात… मराठीसाठी काही कार्यक्रम? उत्तर नाही, मराठी भाषेच्या विकासासाठी काही धोरण? उत्तर नाही, मराठी युवकाला प्रगतीसाठी काही दिशा दर्शक? उत्तर नाही."
"उद्धव ठाकरेंचं भाषण तर नेहमीचं टोमणे मारणारं.. भाजपावर, मोदीजींवर टीका करणारं होतं. शेवटी तर त्यांनी कबुली पण दिली महापालिकेसाठीच नाही तर महाराष्ट्रातसुद्धा जिंकण्यासाठी आम्ही एकत्र आलो, अशा शब्दात केशव उपाध्ये यांनी ठाकरे बंधुंवर निशाणा साधला.
भाजपला घाबरलेल्या उबाठाला "भाऊबंदकी" आठवली
भाजप नेते आशिष शेलार यांनाही राज आणि उद्धव यांच्यावर टीकास्त्र सोडलं आहे. "भाषेसाठी नाही ही तर.. निवडणुकीसाठी जाहीर मनधरणी! महापालिका निवडणुका जवळ आल्यामुळे भाजपला घाबरलेल्या उबाठा सेनेला आता "भाऊबंदकी" आठवली. ज्या भावाला घराबाहेर काढले त्याची जाहीर मनधरणी करण्यासाठी आजचा वरळीचा कौटुंबिक स्नेह मिलनाचा कार्यक्रम होता."
"भाषेचे प्रेम वगैरे काही नव्हतेच आणि ते यांच्या लेखी नाहीच! महापालिकेतील सत्ता मिळवण्यासाठी आणि पुन्हा मुंबईची लुटमार, त्यासाठी सत्ता, यासाठी केलेली ही केविलवाणी धडपड आहे. श्रीमान उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरे यांच्याशी केलेली हातमिळवणी म्हणजे निवडणुकीत हरणार म्हणून कुटुंब "तहात" जिंकण्याचा प्रयत्न!, असं आशिष शेलार यांनी म्हटलं."