BMC News Today : मुंबई महापालिकेच्या ‘एस'विभाग कार्यालय हद्दीतील विक्रोळी आणि भांडूप भागातील डोंगराळ परिसरातील झोपडपट्टीवासियांनी सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करावे, असे आवाहन मु्ंबई महापालिका प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे. विक्रोळी पश्चिम परिसरातील सूर्यानगर,पवई येथील इंदिरानगर,गौतम नगर,पासपोली, जयभीम नगर तसेच भांडूप पश्चिम येथील रमाबाई आंबेडकर नगर भाग 1 व 2,नरदास नगर,गांवदेवी टेकडी,गावदेवी मार्ग,टेंभीपाडा,रावते कंपाऊंड,खिंडीपाडा, रामनगर,हनुमान नगर,हनुमान टेकडी,अशोक टेकडी,आंब्याची भरणी या ठिकाणच्या टेकडीच्या किंवा डोंगराच्या उतारावर वसलेल्या झोपडपट्टीवासियांना प्रशासनाकडून इशारा देण्यात आला आहे.
पाण्याच्या प्रवाहामुळे भूस्खलन होण्याची शक्यता
पावसाळ्यादरम्यान जोरदार पावसाने दरडी कोसळण्याची,पावसामुळे डोंगरावरुन वाहत येणाऱ्या पाण्याच्या प्रवाहामुळे भूस्खलन होऊन घरांची पडझड होण्याची शक्यता तसेच नाल्यांना पूर येण्याची शक्यता असल्यामुळे झोपड्या वाहून जाण्याच्या संभाव्य घटना घडू शकतात.या भागातील धोकादायक इमारतींना किंवा झोपड्यांना एस विभाग कार्यालयातर्फे सावधानतेच्या सूचना आधीच देण्यात आल्या आहेत.
मुंबई महापालिकेनं नागरिकांना केलं मोठं आवाहन
त्यामुळे खबरदारी म्हणून संबंधित भागातील स्थानिक रहिवाश्यांनी स्वतःहून सुरक्षितस्थळी स्थलांतर करावे,असं आवाहन पुन्हा एकदा महापालिका प्रशासनाकडून करण्यात आलं आहे.स्थलांतर न करता तेथेच राहणाऱया रहिवाशांची जबाबदारी त्यांची स्वत:ची असेल.नैसर्गिक आपत्तीने कोणत्याही प्रकारची दुर्घटना अथवा जीवित अथवा वित्तहानी झाल्यास बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासन त्यास जबाबदार राहणार नाही,अशी माहिती ‘एस' विभागाचे सहायक आयुक्त यांनी दिली आहे.