BMC Election Exit Poll: महाराष्ट्रातील 29 महानगरपालिकांच्या निवडणुकांसाठी आज मतदान प्रक्रिया पार पडली असून संपूर्ण राज्याचे लक्ष आता उद्या (शुक्रवार, 16 जानेवारी) होणाऱ्या मतमोजणीकडे लागले आहे. देशातील सर्वात श्रीमंत महानगरपालिका असलेल्या मुंबई महानगरपालिका (BMC) साठी झालेली ही लढत ऐतिहासिक ठरली आहे. कारण तब्बल दोन दशकांनंतर ठाकरे बंधू (उद्धव आणि राज ठाकरे) एकत्र आले आहेत.
शिवसेना ठाकरे गट आणि मनसे मराठीच्या मुद्यावर लक्ष केंद्रीत करत निवडणुकीच्या मैदानात उतरली होती. याचा फायदा देखील राज आणि उद्धव ठाकरे यांना मिळेल, असं या एक्झिट पोलमधून दिसून येत आहे. एक्सिस माय इंडिया (Axis My India) एक्झिट पोलनुसार, काही आकडेवारी समोर आली आहे ज्याद्वारे मुंबईतील मराठी कुणाच्या बाजूने आहे, याचा अंदाज लावला जाऊ शकतो.
(नक्की वाचा- BMC Election 2026 : मुंबई महापालिका निवडणुकीचा निकाल उशिरा लागणार? उमेदवारांची धाकधूक वाढली)
मुंबईतील मराठी मते कुणाला किती?
एक्सिस माय इंडिया (Axis My India) एक्झिट पोलनुसार, मुंबईतील मराठी माणूस ठाकरे गट आणि मनसेच्या बाजून उभा राहिला आहे. मुबंईतील सर्वाधिक 49 टक्के मते शिवसेना ठाकरे गट-मनसेच्या बाजूने आहेत. तर 30 टक्के मराठी माणूस भाजप, 8 टक्के काँग्रेस आणि 13 टक्के मराठी मतं इतरांना पडण्याचा अंदाज आहे.
उत्तर भारतीय मते, भाजप 68 टक्के मनसे-ठाकरे गट 19 टक्के, काँग्रेस 2 आणि इतरांना 13 टक्के मिळाली आहेत. मुस्लीम मते, भाजप 12 टक्के मनसे-ठाकरे गट 28 टक्के, काँग्रेस 29 आणि इतरांना 19 टक्के मिळाली आहेत.
BMC Exit Poll
(नक्की वाचा- Kalyan News: उत्साहात मतदानाचा हक्क बजावण्यासाठी गेलेल्या महिलेला धक्का; नेमकं काय झालं?)
ठाकरे बंधुंसाठी अस्तित्वाची लढाई
देशातील सर्वात श्रीमंत महानगरपालिका असलेल्या मुंबई महानगरपालिका (BMC) साठी झालेली ही लढत ऐतिहासिक ठरली आहे. कारण तब्बल दोन दशकांनंतर ठाकरे बंधू (उद्धव आणि राज ठाकरे) एकत्र येऊन आपला वारसा टिकवण्यासाठी मैदानात उतरले आहेत.
मुंबईच्या 227 जागांसाठी आणि राज्यातील इतर 28 महानगरपालिकांसाठी आज उत्साहात मतदान पार पडले. मुंबईत 74,400 कोटींहून अधिक वार्षिक बजेट असलेल्या बीएमसीच्या सत्तेसाठी 1700 उमेदवार नशीब आजमावत आहेत.
एक्झिट पोलमध्ये किती लोकांचा सहभाग?
एक्सिस माय इंडियाने बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या 227 वॉर्डसाठीचा आपला एक्झिट पोल अहवाल प्रसिद्ध केला आहे. सुमारे 22,758 मतदारांच्या मुलाखतींनंतर हा अहवाल तयार करण्यात आला आहे.