मुंबई महानगर क्षेत्रात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे ठिकठिकाणी पाणी साचण्याच्या घटना घडत आहेत. या साचलेल्या दूषित पाण्यामुळे पावसाळी आजारांचा, विशेषतः 'लेप्टोस्पायरोसिस'चा धोका मोठ्या प्रमाणावर वाढतो. या पार्श्वभूमीवर,मुंबई महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य खात्याने एक महत्त्वाचे माहितीपत्रक जारी केले असून, नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.
लेप्टोस्पायरोसिस म्हणजे काय आणि तो कसा होतो?
मुंबई महानगरपालिकेने दिलेल्या माहितीनुसार, लेप्टोस्पायरोसिस हा जिवाणूंमुळे होणारा एक संसर्गजन्य आजार आहे. हा आजार रोगबाधित प्राण्यांचे, जसे की उंदीर, गाई-गुरे, कुत्रे इत्यादींचे मूत्र पाण्यात किंवा मातीत मिसळल्याने पसरतो. जेव्हा एखादी व्यक्ती अशा दूषित पाणी किंवा मातीच्या संपर्कात येते आणि जर तिच्या त्वचेवर काही जखम किंवा ओरखडा असेल, तर त्या जखमेच्या माध्यमातून हे जिवाणू शरीरात प्रवेश करतात.
(नक्की वाचा- Mumbai-Pune Expressway: मुंबई-पुणे महामार्गावरील वाहतूक ठप्प; रेल्वे वाहतूकही विस्कळीत)
लेप्टोस्पायरोसिसची प्रमुख लक्षणे
साचलेल्या पाण्यातून चालल्यानंतर किंवा दूषित संपर्कात आल्यानंतर खालील लक्षणे आढळल्यास त्वरित वैद्यकीय सल्ला घेणे आवश्यक आहे.
- ताप येणे
- डोळे लाल होणे
- कावीळ
(नक्की वाचा-Mumbai Rain: मुंबईला पावसाचा रेड अलर्ट! सरकारी कर्मचाऱ्यांना अर्ध्या दिवसाची सुट्टी, खासगी कंपन्यांचं काय? )
लेप्टोस्पायरोसिसचा संसर्ग टाळण्यासाठी काय कराल?
- पावसाच्या साचलेल्या पाण्यातून चालणे शक्यतो पूर्णपणे टाळावे. अपरिहार्य परिस्थिती असल्यास चालताना गमबूट किंवा शूजचा वापर आवर्जून करावा.
- जर तुम्ही साचलेल्या पाण्यातून चालला असाल आणि त्यानंतर कोणतीही लक्षणे आढळल्यास, तात्काळ नजीकच्या महानगरपालिका रुग्णालय/दवाखान येथे भेट देऊन प्रतिबंधात्मक उपचार घ्यावेत.
- ताप आल्यास कोणत्याही घरगुती उपचारांवर अवलंबून न राहता पालिकेच्या रुग्णालयात किंवा आपला दवाखाना येथे जाऊन मोफत तपासणी करून घ्यावी आणि वैद्यकीय सल्ल्यानेच औषधोपचार पूर्ण करावेत.