KDMC मुख्यालयावर धडक मोर्चा, खासदार श्रीकांत शिंदे यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी, नेमकं प्रकरण काय?

कल्याण पश्चिमेत सुरू असलेल्या चार पदरी पुलाच्या कामाच्या पार्श्वभूमीवर बुद्धभूमी फाउंडेशनच्या वतीने कल्याण-डोंबिवली महापालिका मुख्यालयावर मोर्चा काढण्यात आला.

जाहिरात
Read Time: 3 mins
Buddha Bhumi Foundation Protest Kalyan

Buddha Bhumi Foundation Protest Againts KDMC : कल्याण पश्चिमेत सुरू असलेल्या चार पदरी पुलाच्या कामाच्या पार्श्वभूमीवर बुद्धभूमी फाउंडेशनच्या वतीने कल्याण-डोंबिवली महापालिका मुख्यालयावर मोर्चा काढण्यात आला.कल्याण पश्चिमेतील प्रेम ऑटो ते विठ्ठलवाडी दरम्यान हा पूल प्रस्तावित आहे.या कामा दरम्यान वालधुनी परिसरातील अडथळे हटवण्याची कारवाई महापालिकेकडून करण्यात आली होती.मात्र, या कारवाईत महापालिका प्रशासनाकडून निष्काळजीपणा झाल्याचा गंभीर आरोप बुद्धभूमी फाउंडेशनकडून करण्यात आला आहे.संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाईच्या मागणीसाठी फाउंडेशनच्या वतीने गेल्या 15 दिवसांपासून केडीएमसी मुख्यालयाबाहेर धरणे आंदोलन सुरू आहे. 

तसच बुद्धभूमी फाउंडेशनकडून मोबदल्याची मागणी देखील केली जात आहे. अद्याप बुद्धभूमी फाउंडेशनच्या मागण्यांची कोणतीही दखल न घेतल्याने सोमवारी या आंदोलनाचे रूपांतर मोर्चात झाले. यावेळी फाउंडेशनच्या भंतेजींनी प्रशासनावर नाराजी व्यक्त करत संबंधित अधिकाऱ्यांचे निलंबन करण्याची मागणी केली. तसेच खासदार श्रीकांत शिंदे यांच्यावरही गंभीर आरोप करत त्यांच्या राजीनाम्याची मागणी मोर्चा दरम्यान करण्यात आली.या संपूर्ण प्रकरणावर अद्याप शिवसेना किंवा कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेकडून अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही.

Advertisement

खासदार श्रीकांत शिंदे यांच्या राजीनाम्याची मागणी

कल्याण शहरातील बुद्धभूमी प्रकरणावरून बौद्ध समाज,भिकू संघ आणि बुद्धभूमी फाउंडेशनच्या वतीने कल्याण-डोंबिवली महापालिकेवर मोर्चा काढण्यात आला.यावेळी आंदोलकांनी बुद्धभूमी परिसरातील कथित कारवाईचा निषेध करत विविध मागण्या मांडल्या.आंदोलकांच्या म्हणण्यानुसार,उड्डाणपुलाच्या कामाच्या नावाखाली बुद्धभूमीचा काही भाग बाधित करण्यात आला असून,बुद्धमूर्ती हटविणे,स्तूपाचे नुकसान करणे आणि झाडांची तोड करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला.तसेच या कामातून आर्थिक लाभ मिळावा म्हणून खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांच्या नातेवाईकांना फायदा करून देण्याचा आरोपही आंदोलकांनी केला.या आरोपांबाबत संबंधितांकडून अधिकृत प्रतिक्रिया अद्याप समोर आलेली नाही.

नक्की वाचा >> Siya Goyal News : केतन अग्रवालच्या हत्येसाठी सिया गोयलने काय काय केलं? संपूर्ण Google हिस्ट्री आली समोर

"बौद्ध समाजाची जाहीर माफी मागावी आणि.."

भिकू संघाच्या म्हणण्यानुसार,गेल्या महिनाभरापासून आंदोलन,उपोषण आणि मोर्चे सुरू असूनही शासन किंवा लोकप्रतिनिधींनी घटनास्थळी येऊन चर्चा केलेली नाही.तसेच महानगरपालिकेने जमिनीच्या नोंदी चुकीच्या पद्धतीने करून बुद्धभूमीवर अन्याय केल्याचा आरोपही आंदोलकांनी केला. मोर्चा दरम्यान खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांनी बौद्ध समाजाची जाहीर माफी मागावी आणि खासदारकीचा राजीनामा द्यावा,अशी मागणी करण्यात आली.

तसेच महापालिका आयुक्त अभिनव गोयल आणि उपायुक्त प्रसाद बोरकर यांचे तात्काळ निलंबन करावे,संबंधितांवर ॲट्रॉसिटी कायद्यांतर्गत गुन्हे दाखल करावेत आणि उड्डाणपूल नदीलगत वळविण्यात आल्यास त्यातून मिळणारा मोबदला बौद्ध समाजाला द्यावा,अशाही मागण्या बुद्धभूमी फाउंडेशनचे भंते गौतमरत्न महाथेरो यांनी केल्या.

या सर्व आरोपांबाबत संबंधित प्रशासन,महापालिका आणि खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांची अधिकृत भूमिका अद्याप समोर आलेली नाही.काही दिवसांपूर्वी मंत्रालयात एक बैठक पार पडली,या बैठकीत बुद्धभूमीचा विकास करण्यासाठी एक प्राधिकरण नेमण्यात आल्याची माहिती देण्यात आली होती.यासंदर्भात महापालिका मुख्यालयाबाहेर बुद्धभूमी फाउंडेशनच्या विरोधात बौद्ध समाजाच्या काही नागरिकांनी आंदोलन केले होते.फाउंडेशनच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत भन्तेजींवर गंभीर आरोप करण्यात आले होते.

Advertisement