1 जूनपासून पशुधनासही आधारकार्ड; अन्यथा सुविधांपासून राहावं लागेल वंचित  

सर्व गायवर्ग, म्हैसवर्ग, शेळी व मेंढी इतर पशुधनास बिल्ला लावणे (टॅगिंग) बंधनकारक करण्यात आले आहे.

Advertisement
Read Time: 2 mins
बुलढाणा:

प्रतिनिधी अमोल गावंडे, बुलढाणा

सर्व गायवर्ग, म्हैसवर्ग, शेळी व मेंढी इतर पशुधनास बिल्ला लावणे (टॅगिंग) बंधनकारक करण्यात आले असून येत्या 1 जूनपासून त्याची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. कानात लावलेल्या बिल्ल्याशिवाय पशुधनाची खरेदी-विक्री करता येणार नाही. त्यामुळे पशुपालकांना पशुधनास कानात बिल्ला लावून घेणे बंधनकारक करण्यात आले आहे.
     
बुलढाणा जिल्ह्यातील शेतकरी, पशुपालक बांधव यांच्याकडे असलेल्या प्रत्येक लहान-मोठ्या पशुधनास कानात बिल्ला असणे आता शासनाने बंधनकारक केलेले आहे. कानातील बिल्ल्याशिवाय पशुधनास पशुवैद्यकीय दवाखान्यामधून पशुवैद्यकीय सेवा दिल्या जाणार नाहीत. नैसर्गिक आपत्ती, विजेचा धक्का तसेच वन्यपशुंच्या हल्ल्यामुळे मृत्युमुखी पडलेल्या पशुधनास कानाला बिल्ला नसल्यास नुकसान भरपाईची रक्कम दिली जाणार नाही. कानात बिल्ला नसलेल्या पशुधनाची बाजार समिती, आठवडी बाजार व गावागावांतील खरेदी-विक्री करण्यास प्रतिबंध करण्यात येत आहे. त्यामुळे कानात बिल्ला नसलेले पशुधन बाजार समितीमध्ये आणले तर त्यांची खरेदी विक्री होणार नाही याची दक्षता संबंधित बाजार समितीद्वारे घेण्यात येईल.

नक्की वाचा - भेंडवळची घटमांडणी शेतकऱ्यांची दिशाभूल करणारी, विद्या सिद्ध करणाऱ्यास अंनिसकडून 50 लाखांचं बक्षिस जाहीर

ग्रामपंचायतीत पशुंच्या विक्री किंवा परिवर्तनाचा दाखला देताना पशुधनाची इअर टॅगिंग झाल्याशिवाय तो देण्यात येऊ नये. जाणीवपूर्वक नष्ट केलेल्या पशुधनाची नोंद भारत पशुधन प्रणालीवर नसल्यास केंद्र व राज्य शासनाकडून देय असलेले आर्थिक सहाय्य देय होणार नाही, नैसर्गिक आपती, विजेचा धक्का तसेच वन्य पशुंच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या पशुधनास कानात बिल्ला मारलेला नसल्यास नुकसान भरपाई रक्कम देय होणार नाही. त्यामुळे पशुपालकांनी पशुधनाच्या कानात बिल्ला मारून घ्यावा, असे आवाहन पशुसंवर्धन विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.

Advertisement
Topics mentioned in this article