CCTV Video : छत्रपती संभाजी नगरमध्ये नागरिकांची झोप उडाली, रात्रीच्या त्या व्हिडीओमुळे लोक भयभीत, काय घडलं?

 ​छत्रपती संभाजीनगरमधील उल्कानगरी परिसरात बुधवारी मध्यरात्री एका प्राण्याच्या व्हायरल व्हिडीओनं नागरिकांच्या झोपा उडवल्या.

जाहिरात
Read Time: 2 mins
Chhatrapati Sambhaji Nagar CCTV Video Viral

मोसिन शेख, प्रतिनिधी

Chhatrapati Sambhaji  Nagar Video : ​छत्रपती संभाजीनगरमधील उल्कानगरी परिसरात बुधवारी मध्यरात्री एका प्राण्याच्या व्हायरल व्हिडीओनं नागरिकांच्या झोपा उडवल्या. सीसीटीव्ही फुटेजमध्ये एक प्राणी परिसरात वावरताना दिसला आणि बघता बघता संपूर्ण शहरात 'बिबट्या आला' ही बातमी वाऱ्यासारखी पसरली. काही महिन्यांपूर्वीच याच भागात बिबट्याचा थरार पाहायला मिळाला. त्यावेळीही नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पाहायला मिळालं होतं. परंतु, नुकताच एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आणि बघता बघता अफवांना पेव फुटले. 

वन विभागाची धावपळ आणि तज्ज्ञांचा फौजफाटा

हा व्हिडीओ व्हायरल होताच वन विभागाने तातडीने सूत्रे हलवली.घटनेचे गांभीर्य लक्षात घेत वन्यजीव तज्ज्ञांसह पथकाने थेट घटनास्थळी धाव घेतली.रात्रीच्या अंधारात सीसीटीव्हीमध्ये दिसणारा तो प्राणी नक्की कोण? तो बिबट्याच होता का? या प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी वन विभागाने तांत्रिक तपासणी सुरू केली. परिसरातील सिमेंटचा रस्ता असल्याने पाऊलखुणा पडताळणी करणे शक्य नव्हते. पण तज्ज्ञांनी व्हिडिओचे निरीक्षण करत हा बिबट्या नसल्याचे स्पष्ट केलं. 

Advertisement

नक्की वाचा >> Tumbadchi Manjula: ओळखा पाहू हे डोळे कुणाचे? 'तुंबाडची मंजुळा' चित्रपटाच्या नव्या पोस्टरने उत्सुकता वाढली!

बिबट्या नव्हे, ती एक मांजर 

​वन विभागाने स्पष्ट केले की, सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसणारा तो प्राणी बिबट्या नसून एक सामान्य 'मांजर' होती. प्रकाशाचा कोन आणि कॅमेऱ्याच्या गुणवत्तेमुळे मांजरीचा आकार मोठा भासत होता.  ज्यामुळे हा गोंधळ निर्माण झाला. तज्ज्ञांनी अधिकृतपणे जाहीर केले की, परिसरात बिबट्याचा कोणताही वावर नाही.

​आजच्या डिजिटल युगात सत्य समोर येण्याआधीच भीतीचं वातावरण निर्माण होतं. हा व्हायरल व्हिडीओ याचं जीवंत उदाहरण आहे. तो प्राणी मांजर असल्याचे सिद्ध होईपर्यंत अनेकांना हा व्हिडीओ 'बिबट्या'चा असल्याचं वाटलं आणि तो प्रचंड व्हायरल सुद्धा झाला. अफवा पसरवणाऱ्यांना वन विभागाने इशारा दिला आहे. नागरिकांनी अशा अपुऱ्या माहितीच्या आधारे घाबरून जाऊ नये, असे आवाहन करण्यात आलं आहे. उल्कानगरीतील त्या 'रात्रीच्या पाहुण्या'ने संपूर्ण शहराला सळो की पळो करून सोडले होते.