अमोल पाटील, छत्रपती संभाजीनगर
नव्या संसाराची गोड स्वप्ने डोळ्यांत साठवून आयुष्याच्या एका नवीन प्रवासाला सुरुवात करणाऱ्या एका नवविवाहितेवर नियतीने क्रूर घाला घातला. छत्रपती संभाजीनगर शहरातून एक मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे. लग्नानंतर अवघ्या सात दिवसांतच एका नवविवाहितेचा अचानक चक्कर येऊन पडल्याने दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या धक्कादायक घटनेमुळे नववधू आणि वर या दोन्ही कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
15 वर्षांच्या प्रेम अन् विवाह
मिळालेल्या माहितीनुसार, मृत नवविवाहितेचे नाव दीपाली लिनहार आहे. दीपाली आणि संदीप खंडाळे हे गेल्या 15 वर्षांपासून एकमेकांच्या प्रेमसंबंधात होते. दीर्घकाळाच्या या प्रेमानंतर, दोन्ही कुटुंबांच्या संमतीने 4 जून रोजी अत्यंत उत्साहात आणि आनंदाच्या वातावरणात त्यांचा विवाह सोहळा पार पडला होता. 15 वर्षांच्या प्रेमाचे विवाहाच्या सुंदर नात्यात रूपांतर झाल्याने दोन्ही बाजूचे नातेवाईक आणि मित्रपरिवार कमालीचे आनंदी होते.
(नक्की वाचा- Vaibhav Sooryavanshi News: "माझ्यासाठी फक्त दोनच संघांनी बोली का लावली?" : वैभव सूर्यवंशी)
माहेरी असतानाच घात झाला!
लग्नाचे सुरुवातीचे विधी आणि सासरचे कार्यक्रम आटोपल्यानंतर दीपाली या परंपरेनुसार माहेरी आली होत्या. संध्याकाळच्या सुमारास दीपाली बाथरूममध्ये गेली असताना अचानक चक्कर आली आणि ती खाली कोसळली. चक्कर येऊन खाली पडल्याने दीपालीची प्रकृती अत्यंत खालावली. कुटुंबीयांनी क्षणाचाही विलंब न लावता त्यांना तत्काळ वैद्यकीय उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांच्या शर्थीच्या प्रयत्नांनंतरही तिची प्राणज्योत मालवली.
(नक्की वाचा- Dharashiv News: "शक्तीपीठ महामार्गासाठी जमीन मोफत देतो, पण...", शेतकऱ्याच्या एका अटीचा तुम्हालाही अभिमान वाटेल)
आठवडाभरातच मोडला संसार
काही दिवसांपूर्वी ज्या घरात सनई-चौघड्यांचे सूर आणि लग्नाच्या मंगलाष्टका दुमदुमत होत्या, तिथे आता फक्त आणि फक्त आक्रोश आणि हुंदके ऐकू येत आहेत. हातावरील लग्नाच्या मेहंदीचा रंगही अजून फिका झाला नव्हता, अंगावरील हळदीची छटा उतरली नव्हती, तोच काळाने दीपाली यांना हिरावून नेले. नव्या आयुष्याची खऱ्या अर्थाने सुरुवात होण्यापूर्वीच हा आनंदाचा प्रवास इतक्या दुर्दैवी वळणावर संपल्याने संदीप खंडाळे आणि लिनहार कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे.