CM Devendra Fadnavis: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे बंधू राजकारणातून कालबाह्य होणार नाहीत, असे स्पष्ट केले. मात्र, गेल्या 25 वर्षांतील कामगिरीमुळे ते मुंबई गमावतील आणि 29 पैकी 27 महापालिकांमध्ये महायुतीचीच सत्ता येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 'लोकमत'ला दिलेल्या विशेष मुलाखतीत महाराष्ट्रातील आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अत्यंत महत्त्वपूर्ण विधाने केली.
देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे कुटुंबाच्या राजकीय अस्तित्वाचा आदरपूर्वक उल्लेख केला. "ठाकरे बंधू कालबाह्य होतील, असे मी अजिबात म्हणणार नाही आणि तशी अपेक्षाही कोणी करू नये," असे म्हणत त्यांनी ठाकरे नावाची ताकद मान्य केली, पण त्यांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
(नक्की वाचा- Holiday on 15 January: 15 जानेवारीला राज्यात सुट्टी जाहीर; कुठे आणि कुणाला मिळणार लाभ?)
ठाकरे कालबाह्य का होणार नाहीत?
फडणवीस यांच्या मते, राजकारणात परिस्थिती बदलत असते. ठाकरे बंधूंनी गेल्या 25 वर्षांत मुंबईला अपेक्षित विकास दिला नाही, त्यामुळे लोकांमध्ये नाराजी आहे. ठाकरेंविषयीची नकारात्मकता आणि महायुतीने केलेल्या कामाबद्दलची सकारात्मकता यामुळे मुंबईकर यावेळी महायुतीला पसंती देतील. "पुढच्या 5 वर्षांत आम्ही काही चुका केल्या तर लोक त्यांना पुन्हा निवडून देतील, पण आम्ही चुका करणार नाही," असे सांगत त्यांनी महायुतीच्या कार्यक्षमतेवर भर दिला.
29 पैकी 27 महापालिकांत महायुतीचाच महापौर!
निवडणुकोत्तर समीकरणांबाबत मुख्यमंत्र्यांनी मोठे भाकीत केले आहे. राज्यातील 29 पैकी 27 महापालिकांमध्ये महायुतीचेच महापौर बसतील. यात भाजप सर्वात मोठा पक्ष असेल. मित्रपक्ष (शिंदे सेना, अजित पवार गट) काही ठिकाणी विरोधात लढले असले, तरी निकालांनंतर त्यांना सोबत घेऊनच कारभार केला जाईल. काँग्रेस, ठाकरे गट किंवा मनसे यांपैकी कोणाशीही महापालिकांमध्ये सत्तेसाठी युती केली जाणार नाही.
(नक्की वाचा- Mumbai Election: मुंबईत महायुतीला मोठा झटका! निवडणुकीआधीच 4 प्रभाग गमावले; नेमकं काय झालं?)
अजित पवार 2029 पर्यंत सोबतच
अजित पवारांच्या भूमिकेवर सुरू असलेल्या चर्चांना पूर्णविराम देत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी म्हटलं की, अजित पवार सरकारमध्येच राहतील आणि 2029 ची निवडणूकही आम्ही सोबतच लढू.
त्यांनी हे देखील स्पष्ट केले की, जरी काही ठिकाणी आमचे लोक एकमेकांविरुद्ध लढत असले, तरी आम्ही एकमेकांचा सन्मान राखून विकासाचा अजेंडा मांडत आहोत.