उपनगरीय रेल्वे ही मुंबईची जिवनवाहीनी समजली जाते. लाखो मुंबईकर या लोकलने रोज प्रवास करतात. त्यामुळे मुंबईच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत सहज पोहोचता येते. मुंबई प्रमाणे पुणे ही आता झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे तिथल्या वाहतूक व्यवस्थेवर ताण पडत आहे. अनेक ठिकाणी रस्ते मार्गात वाहतूक कोंडी दिसते. त्यावर उपाय म्हणून सध्या मेट्रो पुण्यात कार्यरत आहे. पण वाढणारं शहर आणि वाढणारी लोकसंख्या पाहाता ती ही कमी पडणार असं बोललं जात आहे. त्यामुळेच त्याला पर्याय म्हणून मुंबई प्रमाणे लोकल सेवा पुण्यात असावी अशी मागणी होत आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
पुण्यात रेल्वेची लोकल सेवा सुरू करावी अशी मागणी विधानसभेत करण्यात आली आहे. सध्या विधीमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू आहे. या पार्श्वभूमीवर विधानसभेत शिवसेना शिंदे गटाचे आमदार विजय शिवतारे यांनी याबाबतचा प्रश्न विचारला होता. पुण्यात मुंबई प्रमाणे लोकलची गरज असल्याचं ते म्हणाले. मुळा-मुठा नदी पात्राच्या बाजूने ही लोकल कार्यरत करता येवू शकते. सध्या पुण्यात मेट्रो सेवा आहे. पण मेट्रो आणि पीएमपीएमएलची कनेक्टीव्हिटी नाही नाही. त्यामुळे प्रवास करताना गैर सोय होते असं शिवतारे यावेळी म्हणाले.
त्यामुळे मुळामुठा नदी पात्राच्या बाजूने लोकलचे नियोजन केले तर त्याचा थेट पुणेकरांना फायदा होईल. शिवाय पूर्व, पश्चिम आणि दक्षिण उत्तर असं शहर जोडलं जाईल. त्यामुळे याबाबत नियोजन करून अंमलबजावणी करणार का ? असा प्रश्न त्यांनी विधानसभेत सरकारला केला होता. यावर सरकारकडून राज्यमंत्री असलेल्या माधुरी मिसाळ यांनी उत्तर दिलं. त्या म्हणाल्या या सर्व सूचना विचारात घेण्यात येतील. माधुरी मिसाळ या ही पुण्याच्या आहेत. त्या पुण्यातील पर्वती मतदार संघातून निवडून आल्या आहेत. त्यांनीही पुणे लोकल बाबत सकारत्म असल्याचं सांगितलं आहे.
मुंबईत लोकल प्रवास हा एक महत्वाचा भाग बनला आहे. प्रत्येक मुंबईकर हा लोकलचा पुरेपुर वापर करतो. सध्या मुंबईत लोकल शिवाय मेट्रो, मोनो रेल्वेचा ही ऑप्शन मुंबईकरांना आहे. शिवाय ही सेवा एकमेकांना जोडली गेली आहे. त्यामुळे प्रवासाचा वेळ ही वाचत आहे. त्याच प्रमाणे आता पुण्यात ही लोकलची मागणी होत आहे. मेट्रो आली असली तरी लोकल आल्यास वाहतूकीवरचा ताण बऱ्या पैकी कमी होईल असं ही बोललं जात आहे.