जाहिरात
This Article is From Jun 08, 2024

निवडणुकीत जय-पराजय होत असतात, सोशल मीडियावर वातावरण दूषित करू नये; धनंजय मुंडेंचे आवाहन

सोशल मीडियावर जातीवाचक व विविध नेत्यांची अवहेलना करणाऱ्या पोस्ट केल्या जात असून याद्वारे सामाजिक सलोखा बिघडून आपसातील द्वेष व तणाव वाढत आहे. त्यामुळे आपला सामाजिक सलोखा व सौहार्द जपण्याची जबाबदारी आता प्रत्येक बीड जिल्हा वासियांची आहे.

निवडणुकीत जय-पराजय होत असतात, सोशल मीडियावर वातावरण दूषित करू नये; धनंजय मुंडेंचे आवाहन

स्वानंद पाटील, बीड

राज्याचे लक्ष असलेली बीड लोकसभा निवडणूक अत्यंत अनेक मुद्द्यांनी गाजली. वेगळ्या वातावरणात झालेल्या या निवडणुकीत झालेला पराजय आम्ही मोकळ्या मनाने स्वीकारला. विजयी उमेदवाराचे अभिनंदन सुद्धा केले. मात्र अजूनही सोशल मीडियावर जातीवाचक व विविध नेत्यांची अवहेलना करणाऱ्या पोस्ट केल्या जात असून याद्वारे सामाजिक सलोखा बिघडून आपसातील द्वेष व तणाव वाढत आहे. त्यामुळे आपला सामाजिक सलोखा व सौहार्द जपण्याची जबाबदारी आता प्रत्येक बीड जिल्हा वासियांची आहे, असे आवाहन जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी आज व्हिडीओ मेसेजद्वारे केले आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

"क्या हार मे, क्या जीत में, किंचित नही भयभीत मै", स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी यांच्या या कवितेप्रमाणे मी व पंकजांनी अत्यंत जिव्हारी लागणारा हा पराभव मान्य केला आहे. लोकशाहीत जनतेचा कौल हा महत्त्वाचा असतो आणि तो कौल आपण मान्य करून विजयी उमेदवारास शुभेच्छा देखील दिल्या आहेत.

मात्र सोशल मीडियावर अजूनही आमच्यासारख्या नेत्यांचे फोटो आणि बनावट व्हिडीओ पोस्ट करून वातावरण दूषित केले जात आहे. अत्यंत खालच्या भाषेत राजकीय नेत्यांवर टीका करणाऱ्या पोस्ट तसेच जाती-जातीत तेढ निर्माण करणाऱ्या पोस्ट व्हायरल केल्या जात आहेत. महायुती व महाविकास आघाडीच्या दोन्हीकडच्या कार्यकर्त्यांना माझी विनंती आहे, की हे आता थांबलं पाहिजे, असंही धनंजय मुंडे यांनी म्हटलं आहे. 

(वाचा -  मोदींच्या मंत्रिमंडळात महाराष्ट्रातले 4 चेहरे? 'या' 4 नावांची चर्चा, आठवलेंचं काय?)

मी बीड जिल्ह्याचा पालकमंत्री असल्याने नियमानुसार मतमोजणी प्रक्रियेत किंवा मतमोजणी केंद्राच्या जवळपास सुद्धा उपस्थित नसताना मी बंदूक काढली किंवा कोणाला मारहाण केली, अशा पद्धतीच्या खोट्या पोस्ट जाणीवपूर्वक पेरल्या जात आहेत. या गोष्टीत अजिबात तथ्य नसून या गोष्टी पूर्णपणे खोटारड्या व जाणीवपूर्वक बदनामी करणाऱ्या आहेत. 

(वाचा -  मोठा गौप्यस्फोट! प्रतिभा धानोरकरांचा 'लाख' मोलाचा विजय, पडद्यामागून कोणाची मदत?)

अशा गोष्टी पेरल्याने काय साध्य होणार आहे, असा प्रश्नही धनंजय मुंडे यांनी उपस्थित केला आहे. 350 वर्षांपूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्याला 18 पगड जातींना एकत्र घेऊन गावगाडा चालवायची शिकवण दिली. आज त्या शिकवणीपासून परावृत्त न होता, आपला गावगाडा व आपली सामाजिक एकतेची परंपरा अबाधित ठेवणे हे सर्व जिल्हा वासीयांचे आद्य कर्तव्य असल्याचेही धनंजय मुंडे यांनी म्हटले आहे.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us: