मुंबईकरांनो इकडे लक्ष द्या! कोस्टल रोडच्या वापरासाठीच्या वेळेत बदल

मुंबई महानगरपालिकेने (BMC) याबाबतची माहिती प्रसिद्ध केली आहे. हा रस्ता आठवड्यातील सातही दिवस सुरू राहणार आहे.

Advertisement
Read Time: 2 mins
मुंबई:

धर्मवीर, स्‍वराज्‍यरक्षक छत्रपती संभाजी महाराज मुंबई किनारी रस्‍ता अर्थात मुंबई कोस्टल रोडच्या (Mumbai Coastal Road) वेळेत बदल करण्यात आला आहे. मुंबई महानगरपालिकेने (BMC) याबाबतची माहिती प्रसिद्ध केली आहे. हा रस्ता आठवड्यातील सातही दिवस सुरू राहणार आहे. दक्षिण मुंबईकडे येण्यासाठी वरळीतील बिंदूमाधव चौक ते मरीन ड्राईव्हपर्यंतची मार्गिका आणि दक्षिण मुंबईकडून वांद्रेकडे येण्यासाठी;  मरीन ड्राईव्‍ह, हाजी अली आणि रजनी पटेल चौक (लोटस जंक्‍शन) ते वांद्रे वरळी सागरी सेतूपर्यंतची (राजीव गांधी सागरी सेतू) मार्गिका वाहतुकीसाठी खुली राहणार आहे. हा रस्ता वाहतुकीसाठी सकाळी 7 वाजल्यापासून रात्री 12 वाजेपर्यंत खुला असेल. 
 

'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

मुंबई कोस्टल रोड हा दक्षिण मुंबईतील शामलदास गांधी मार्ग जो प्रिन्‍सेस स्‍ट्रीट म्हणून प्रसिद्ध आहे तिथपासून वांद्रे - वरळी सीलिंकच्या वरळी टोकापर्यंत बांधण्‍यात येत आहे. आजतागायत या प्रकल्‍पाचे 92 टक्के काम पूर्ण झाल्याची माहिती महापालिकेने दिली आहे.  गणेशोत्‍सवादरम्‍यान मुंबई किनारी रस्‍ता प्रकल्‍प हा दिनांक 06 सप्‍टेंबर 2024 ते 18 सप्‍टेंबर 2024 या कालावधीत 24 तास वाहतुकीसाठी खुला होता. शनिवार म्हणजेच 21 सप्‍टेंबर 2024 पासून हा मार्ग वाहतुकीसाठी आठवड्यातील सातही दिवस सकाळी 7 ते रात्री 12 वाजेपर्यंत सुरू राहणार आहे. तर, रात्री 12 ते सकाळी 7 या वेळेत वाहतुकीसाठी बंद राहणार आहे.

नक्की वाचा:  iPhone 16 च्या खरेदीसाठी लोकांच्या स्टोअरबाहेर रांगा

दक्षिणवाहिनी बिंदूमाधव ठाकरे चौक, रजनी पटेल चौक (लोटस जंक्‍शन) आणि अमरसन्‍स उद्यान ते मरीन ड्राईव्‍ह ही मार्गिका तसेच, उत्‍तरवाहिनी मरीन ड्राईव्‍ह, हाजी अली आणि रजनी पटेल चौक (लोटस जंक्‍शन) ते वांद्रे वरळी सागरी सेतूपर्यंतची (राजीव गांधी सागरी सेतू) मार्गिका वाहतुकीसाठी खुली राहणार आहे. कोस्टल रोडच्या उर्वरीत काम कधी पूर्ण होणार या प्रश्नाला उत्तर देताना महापालिकेने म्हटले की, उर्वरित कामकाज वेगाने सुरू आहे. वाहनचालकांनी वेगमर्यादा, वाहतूक नियमांचे काटेकोरपणे पालन करावे. वाहतूक शिस्‍त पाळावी. वाहने चालविताना अधिकची काळजी घ्‍यावी. अपघात टाळावेत आणि महानगरपालिका प्रशासनास सहकार्य करावे.

Topics mentioned in this article