डोंबिवली स्टेशन परिसरात शॉरमा (Shawarma) विकणाऱ्या एकता सावंत या मराठी तरुणीच्या स्टॉलवर कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेने (KDMC) केलेल्या कारवाईमुळे वाद निर्माण झाला होता. या कारवाईत पालिकेने दुटप्पी भूमिका घेतल्याचा आरोप करत, राज ठाकरे यांच्या आदेशावरून मनसेचे नेते अविनाश जाधव यांनी घटनास्थळी धाव घेत तरुणीला जाहीर पाठिंबा दिला आहे.
डोंबिवली रेल्वे स्टेशनबाहेर शॉरमा विकणाऱ्या एकता सावंत या मराठी तरुणीवर केडीएमसी प्रशासनाने नुकतीच कारवाई केली होती. मात्र, या कारवाईत केवळ मराठी माणसालाच लक्ष्य केले जात असून परप्रांतीय फेरीवाल्यांना पाठीशी घातले जात असल्याचा मुद्दा पुढे आला होता. मनसेने मदतीचा हात पुढे केल्यानंतर एकता सावंत हिने राज ठाकरे, अविनाथ जाधव आणि मनसेचे जाहीर आभार मानले.
परप्रांतिय किंवा मराठी असा भेदभाव करायचा नाही
मनसेने केलेल्या मदतीनंतर एकता सावंत हिने म्हटलं की, मला परप्रांतिय किंवा मराठी असा भेदभाव करायचा नाही. सगळ्यांनी कमवा आणि मलाही कमवू द्या. माझी एकटीची तक्रार करून माझा धंदा बंद करू नका. माझ्यावर जळू नका, कारण मी प्रगती करू शकते तर तु्म्हीही करू शकतात. महापालिकेत माझी तक्रार कोण करतंय कळत नाही. मी वॉर्ड अधिकाऱ्यांनाही विचारलं कुणी तक्रार केली. मात्र त्यांनी तक्रार पोर्टलवरून येत असल्याचं त्यांनी मला सांगितलं.
(नक्की वाचा- Bhiwandi News: कॅन्सरग्रस्त पत्नीला हुंड्यासाठी त्रास; घराबाहेर अघोरी कृत्याने परिसरात खळबळ, 6 जणांवर गुन्हा)
व्हिडीओ सोशल मीडियावर टाकते याचाच त्रास
सोशल मीडियावर मला व्हिडीओ टाकायचा अधिकार आहे. मात्र मी व्हिडीओ सोशल मीडियावर टाकते यांचा सगळ्यांना त्रास होता. मला सगळे विचारायचे तू सोशल मीडियावर व्हिडीओ का टाकतो? मात्र मला माझा बिझनेस प्रमोट करायचा आहे तर मला हे करावंच लागणार आणि तेच मी करत होते. मात्र केडीएमसीवाल्यांना मी व्हिडीओ सोशल मीडियावर टाकते याचाच त्रास होता, असं एकता सावंत हिने सांगितलं. एकता सावंत ही रील स्टार असून तिचे इंस्टाग्रामवर 5 लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत.
माझा अनेकदा धंदा बंद केला. एकदा 100-200 रिक्षावाले एकत्र आले आणि माझा धंदा केला. केडीएमसी कर्मचाऱ्यांनीही मला तुझी टपरी फोडून टाकेन अशी धमकी दिली होती. माझी गाडी हटवल्यानंतर मी बाजूला असलेल्या शाखेत गेली होता. शिव वडापावसाठी जशी टपरी मिळाली तशीच मला द्या, अशी मी त्यांना विनंती केली होती. मात्र त्यांनी 'आता ते बंद झालं', असं सांगितलं. रविंद्र चव्हाण यांचीही भेट घेण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांची भेट होऊ शकली नाही, असंही एकताने सांगितलं.
(नक्की वाचा- Solapur News: भाजपला रोखण्यासाठी शिंदे आणि ठाकरेंची शिवसेना एकत्र; दोन्ही राष्ट्रवादीही सोबत)
"राज ठाकरे आयुक्तांशी बोलतील"
दरम्यान या संदर्भात या तरुणीने इंस्टाग्रामवर पोस्ट करत आपली कैफियत मांडली असता या इंस्टाग्राम पोस्टची दखल आता थेट राज ठाकरे यांनी घेतली. त्यानंतर मनसे नेते अविनाश जाधव मला भेटायला आले होते. राज ठाकरे यांनी मला इथे पाठवलं आहे तू तुझा धंदा बिनधास्त इथे लाव. मी मदत करतो, अशा शब्द अविनाश जाधव यांनी मला दिला. राज ठाकरे आयुक्तांशी बोलतील, असंही अविनाश जाधव यांनी मला सांगितलं, असं एकता सावंतने म्हटलं.