Dombivli News: डोंबिवलीकरांची अनेक वर्षांची प्रतीक्षा अखेर संपणार असून शहरातील वाहतूक कोंडीचा मोठा प्रश्न मार्गी लागणार आहे. डोंबिवली पश्चिम भागातील रेतिबंदर रोडवरील बहुचर्चित रेल्वे उड्डाणपुलाच्या कामासाठी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने निविदा जाहीर केल्या आहेत. या उड्डाणपुलामुळे शहराच्या दोन भागांना जोडणारा प्रवास केवळ वेगवानच होणार नाही, तर तासनतास फाटकावर उभं राहणाऱ्या हजारो वाहनधारकांना मोठा दिलासा मिळणार आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून डोंबिवली पश्चिम भागातील रेल्वे क्रॉसिंग क्रमांक 1 येथे रेल्वे फाटकामुळे नागरिक हैराण झाले होते. विशेषतः सकाळी आणि संध्याकाळी ऐन गर्दीच्या वेळी येथे मोठी वाहतूक कोंडी निर्माण होते. अनेकदा रुग्णवाहिकांसारख्या आपत्कालीन सेवा देखील या कोंडीत अडकून पडत होत्या. त्यामुळे येथे उड्डाणपूल व्हावा, अशी आग्रही मागणी सातत्याने केली जात होती. आता निविदा प्रक्रिया सुरू झाल्याने प्रत्यक्ष कामाला लवकरच सुरुवात होणार आहे.
लोकप्रतिनिधींच्या पाठपुराव्याला यश
या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी आमदार रवींद्र चव्हाण आणि नगरसेवक दिपेश म्हात्रे यांनी प्रशासकीय पातळीवर सातत्याने पाठपुरावा केला होता. सुरुवातीला हा उड्डाणपूल केवळ 2 लेनचा प्रस्तावित होता. मात्र भविष्यातील वाढती लोकसंख्या आणि वाहनांची संख्या लक्षात घेऊन हा पूल 4 लेनचा असावा, असा आग्रह दिपेश म्हात्रे यांनी धरला होता. त्यांच्या या प्रयत्नांमुळे अखेर प्रशासनाने 4 लेनच्या पुलाला मान्यता दिली असून आता त्यानुसारच काम केले जाणार आहे.
( नक्की वाचा : Sanjay Raut: ठाकरेंचा राऊतांना 'चेक मेट'! आदित्य ठाकरेंनी निर्णय फिरवला आणि संजय राऊतांचा पत्ता कट झाला? )
प्रवासाचा वेळ आणि इंधन वाचणार
प्रस्तावित उड्डाणपुलाचे काम पूर्ण करण्यासाठी सुमारे 24 महिन्यांचा म्हणजेच 2 वर्षांचा कालावधी निश्चित करण्यात आला आहे. हा पूल प्रत्यक्ष वाहतुकीसाठी खुला झाल्यानंतर पूर्व आणि पश्चिम डोंबिवलीतील प्रवास अत्यंत सुखकर होणार आहे. फाटकावर थांबावे लागत नसल्यामुळे नागरिकांचा वेळ वाचेल आणि इंधनाचीही मोठी बचत होईल. शहराच्या पायाभूत सुविधांच्या दृष्टीने हा एक मैलाचा दगड मानला जात आहे.
डोंबिवलीच्या विकासाला नवी गती
उड्डाणपूल उभारणीच्या या निर्णयामुळे डोंबिवली शहराच्या विकासाला मोठी चालना मिळणार आहे. 4 लेनचा पूल झाल्यामुळे वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम होणार असून परिसरातील नागरिकांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे. हा प्रकल्प वेळेत पूर्ण झाल्यास शहराच्या अंतर्गत वाहतुकीचा चेहरामोहरा बदलण्यास मदत होईल, असा विश्वास नगरसेवक दिपेश म्हात्रे यांनी व्यक्त केला आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world