पायी वारी करणाऱ्यांना मिळणार पेन्शन, राज्य सरकारकडून ‘वारकरी महामंडळ’ची स्थापना

तीर्थक्षेत्रांचा विकास, कीर्तनकार, वारकऱ्यांना अन्न, सुरक्षा, वैद्यकीय मदत,  विमाकवच, पायाभूत सुविधा इत्यादी सोयी-सुविधा पुरवण्याकरिता व कल्याणकारी योजना राबवण्याकरिता “मुख्यमंत्री  वारकरी महामंडळ” कार्य करणार आहे.

Advertisement
Read Time: 2 mins

पंढरपूरच्या विठुरायाची यात्रा व आषाढी एकादशी दोन दिवसांनी येऊ घातली असताना राज्यातील तमाम वारकऱ्यांसाठी शासनाने मोठी आनंदाची बातमी दिली आहे. महाराष्ट्र राज्यातील कीर्तनकार व वारकऱ्यांना सोयी सुविधा पुरवण्याकरिता “मुख्यमंत्री वारकरी महामंडळ” स्थापन करण्याचा  मोठा निर्णय शासनाने घेतला आहे. सामाजिक न्याय विभागाचा शासन निर्णय प्रसिद्ध  करण्यात आला आहे. या महामंडळाचे मुख्यालय ते पंढरपूर  येथे असणार आहे. या माध्यमातून परंपरेने महिन्याची पायी वारी करणाऱ्या वारकऱ्यांना वृद्धापकाळामध्ये वारकरी पेन्शन योजना करण्यात येणार आहे. 

( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

महाराष्ट्रातील गावागावातून भाविक वारकरी दरवर्षी वारीला जातात वारीमध्ये प्रामुख्याने कामकरी, कष्टकरी, शेतकरी यांचा समावेश असतो. मात्र कालानुरूप दिंड्यांची संख्या वाढल्याने वारीच्या व्यवस्थापनाचे सूक्ष्म नियोजन महत्त्वाचे ठरले आहे. याकरिता वारकरी महामंडळाची संकल्पना आली असून राज्य मंत्रिमंडळाच्या दिनांक 11 जुलै 2024 रोजी झालेला बैठकीत “मुख्यमंत्री वारकरी महामंडळ” स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

तीर्थक्षेत्रांचा विकास, कीर्तनकार, वारकऱ्यांना अन्न, सुरक्षा, वैद्यकीय मदत,  विमाकवच, पायाभूत सुविधा इत्यादी सोयी-सुविधा पुरवण्याकरिता व कल्याणकारी योजना राबवण्याकरिता “मुख्यमंत्री  वारकरी महामंडळ” कार्य करणार आहे. त्यामध्ये प्रामुख्याने वारकरी संप्रदायाच्या अडीअडचणी प्रश्न सोडवणे सर्व पालखी सोहळा मार्गाची सुधारणा करणे वारकरी भजनी मंडळाला भजन व कीर्तन साहित्य करिता अनुदान देणे. 

(नक्की वाचा - पुढचा मुख्यमंत्री कोण? सत्तारांनी थेट नाव घेतले, किती जागा जिंकणार तेही सांगितले)

पंढरपूर, देहू, आळंदी, मुक्ताईनगर, सासवड, पिंपळनेर, त्र्यंबकेश्वर, पैठण, कोल्हापूर, शेगाव, तारकेश्वर, भगवानगड, अगस्तीऋषी संत सावता माळी समाज मंदिर अरण तालुका माढा जिल्हा सोलापूर व इतरही तीर्थक्षेत्रांचा विकास या महामंडळाच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. त्याचबरोबर चंद्रभागा, इंद्रायणी, गोदावरी व इतर नद्या प्रदूषणमुक्त करण्याबाबतची देखील उपाययोजना महामंडळाच्या माध्यमातून करण्यात येणार आहे.

Advertisement

(नक्की वाचा - विधानपरिषदेतील पराभवानंतर जयंत पाटलांची पहिली प्रतिक्रिया, पुढील भूमिका केली स्पष्ट)

महामंडळाच्या प्रस्तावित योजना?

  • परंपरेने महिन्याची पायी वारी करणाऱ्या वारकऱ्यांना वृद्धापकाळामध्ये वारकरी पेन्शन योजना करण्यात येणार आहे. 
  • वारकरी संप्रदयाच्या अडीअडचणी, प्रश्न सोडवणे.
  • सर्व पालखी सोहळ्यांच्या मार्गाची सुधारणा करणे.
  • स्वच्छता, आरोग्य, निवारा, सुविधांसाठी आर्थिक तरतूद करणे.
  • आषाढी-कार्तिकी वारीसाठी येणाऱ्या वारकऱ्यांना सुरक्षा, विमा कवच.
  • वारकरी भजनी मंडळाला भजन-कीर्तन साहित्याकरिता अनुदान.
  • कीर्तनकारांना आरोग्य विमा, मानधन सन्मान योजना राबवणार.
  • आषाढी-कार्तिकी वारीसाठी दिंड्यांना दरवर्षी सानुग्रह अनुदान देणार.
  • पंढरपूर, देहू, आळंदी, मुक्ताईनगर, सासवड, पिंपळनेर, त्र्यंबकेश्वरचा विकास करणे.
  • पैठण, कोल्हापूर संस्थान, शेगाव, तारकेश्वर, भगवानगड इत्यादी क्षेत्रांचा विकास करणे.
  • परंपरेने महिन्याची पायी वारी करणाऱ्या वारकऱ्यांना पेन्शन योजना सुरु करणे.
Topics mentioned in this article