गणेशोत्सवाच्या मंगलमय वातावरणाचा मुहूर्त साधून धारावी पुनर्विकास प्रकल्पाचा (DRPPL) चा भूमिपूजन सोहळा पार पाडला. गुरुवारी सकाळी माटुंगा येथील RPF मैदानावर हा सोहळा आयोजित करण्यात आला होता. पीटीआय या वृत्तसंस्थेने याबाबतचे वृत्त दिले आहे. सेक्टर 6 मध्ये झालेल्या या भूमिपूजनाने रेल्वे कर्मचाऱ्यांची निवासस्थाने आणि कार्यालये उभारण्याच्या कामाचाही शुभारंभ झाला. धारावी पुनर्विकासाच्या निविदेनुसार, ही रेल्वे कर्मचाऱ्यांची निवासस्थाने आणि कार्यालये सरकारकडे हस्तांतरीत केली जाणार आहेत. आजचा दिवस हा समस्त धारावीकर आणि मुंबईसाठी ऐतिहासिक दिवस होता कारण धारावी पुनर्विकास प्रकल्पाने आधुनिक धारावीच्या निर्मितीमध्ये मोठे पाऊल उचलले आहे, जे भविष्यात धारावीकरांच्या जीवनमानात लक्षणीय सुधारणा घडवून आणेल. पुनर्विकासाची गती वाढवण्यासाठी आणि सर्वसमावेशक विकास सुनिश्चित करण्यासाठी सध्या राज्य सरकार धारावीत घरोघरी जाऊन पात्र आणि अपात्र रहिवाशांचं सर्वेक्षण करत आहे.
हे ही वाचा : "विरोध करणारे बहुतेक लोक बाहेरचे", धारावीतील स्वयंसेवी संस्थांचा पुनर्विकास सर्वेक्षणाला पाठिंबा
गुरुवारी, झालेल्या या भूमिपूजन सोहळ्याचे महत्त्व हे केवळ धारावीच्या रहिवाशांसाठी आणि व्यवसायिकांपुरते मर्यादित नसून ते संपूर्ण मुंबईसाठी महत्त्वाचे आहे. किमान 10 लाख लोकांना मोठ्या, आधुनिक घरांसह उच्च दर्जाच्या सुविधा या पुनर्विकास प्रकल्पामुळे मिळणार आहेत. या सुविधांच्या लाभाला इथले लोक पिढ्यानपिढ्या मुकले होते.
हे ही वाचा: धारावी पुनर्विकास प्रकल्पातील 10 हजार लोकांचे सर्वेक्षण पूर्ण, CEO श्रीनिवास यांची माहिती
या पुनर्विकासामुळे धारावीतील अनेक लघु उद्योगांना लाभ होईल. या लघुउद्योगांनी आपली स्वतःची अशी छोटेखानी अर्थव्यवस्था निर्माण केली आहे. परंतु, अपुऱ्या जागेअभावी त्यांना अत्यंत खराब स्थितीत राहून काम करावं लागतंय. DRPPLच्या सूत्रांनी सांगितल्यानुसार, हा भूमिपूजन सोहळा आधुनिक धारावी निर्माण करण्यासाठीच्यादृष्टीने टाकलेलं पहिलं पाऊल होतं. ते पुढे म्हणाले की, “आम्ही जगातील सर्वाधिक लोकसंख्येची घनता असलेल्या विभागाचा पुनर्विकास करतो आहोत. आम्ही धारावीकरांना ‘key to key' म्हणजे थेट घराची चावी देण्याबद्दलच आश्वासित केले आहे. ज्यात विद्यमान रहिवाशांना तात्पुरत्या निवाराकेंद्रात स्थलांतरीत न करता निश्चित कालावधीत घरे देण्याची ग्वाही दिली आहे.”
हे ही वाचा : दयनीय अवस्थेत आणखी किती दिवस जगायचे? विकासाची आस लागलेल्या धारावीकरांचा संतप्त सवाल
धारावी पुनर्विकास प्रकल्प हा भारताला जागतिक स्तरावर नेणारा प्रकल्प ठरणार आहे. या पुनर्विकास प्रकल्पाअंतर्गत इथल्या रहिवाशांना 350 चौ. फूट आधुनिक घरं दिली जातील. ज्यात स्वयंपाकघर आणि शौचालय असेल. या प्रकल्पाअंतर्गत चांगले रस्ते असतील याशिवाय या प्रकल्पाअंतर्गत रुग्णालये, शाळा, मोकळ्या जागा इत्यादी सुविधाही उपलब्ध करून दिल्या जातील. या प्रकल्पाअंतर्गत दिल्या जाणारी घरे ही इतर कोणत्याही झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पांपेक्षा 17% मोठी असणार आहेत. धारावी पुनर्विकास प्रकल्प संपूर्ण देशातील सर्वात महत्वाचा पुनर्विकास प्रकल्प आहे. ज्यात अपात्र मानल्या गेलेल्या व्यक्तीला देखील घर मिळेल. या अपात्र रहिवाशांना दोन उपवर्गात विभागले गेले आहे. 1 जानेवारी 2000 ते 1 जानेवारी 2011 दरम्यानच्या कालावधीतील रहिवाशांना मात्र परवडणाऱ्या किमतीत मालकीची घरं दिली जातील असे पीटीआयने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे. 2011 नंतरच्या घरधारकांना राज्य सरकारच्या परवडणाऱ्या भाड्याच्या घरांच्या धोरणानुसार घरे दिली जातील. ज्यात भाड्याने घर घेऊन नंतर ते विकत घेण्याचा पर्याय उपलब्ध असेल. सर्व पात्र आणि प्रदूषण न करणाऱ्या उद्योग आणि व्यावसायिकांचं धारावीमध्येच पुनर्वसन केलं जाणार आहे.