Weather Report : मागील काही दिवसांपासून राज्यात धुमाकूळ घालणारा पाऊस आज विश्रांती घेणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. विदर्भ वगळता उर्वरित महाराष्ट्रात हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. विदर्भातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ, सोसाट्याचा वारा (50-60 किमी प्रतितास वेग) आणि मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
उत्तर कोकण, उत्तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ, सोसाट्याचा वारा आणि हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. दक्षिण कोकणातील जिल्ह्यांमध्ये आणि दक्षिण मध्य महाराष्ट्राच्या घाट भागातील तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
मुंबईसाठी पावसाचा काय आहे अंदाज?
मुंबई शहर आणि उपनगरांसाठी स्थानिक अंदाजानुसार, शहर आणि उपनगरात ढगाळ आकाशासह गडगडाटी वादळे आणि हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे. कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे 33 अंश सेल्सिअस आणि 24 अंश सेल्सिअसच्या आसपास असेल.
मराठवाड्यात अतिवृष्टी
यंदा मे महिन्यातच मराठवाड्यात पावसाने धुमाकूळ घातला आहे. छत्रपती संभाजीनगर, जालना, लातूर, हिंगोली नांदेड या पाच जिल्ह्यातील तब्बल 34 महसूल मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली आहे. प्रशासनाने दिलेल्या आकडेवारीनुसार या 34 महसूल मंडळाअंतर्गत 680 गावांना अतिवृष्टीचा तडाखा बसला आहे. शासनाच्या नियमानुसार 65 मिलिमीटर पेक्षा अधिक पावसाची नोंद झाल्यास, त्या ठिकाणी अतिवृष्टी समजली जाते.