प्रसाद पाटील, प्रतिनिधी
Mumbai-Pune Express Way Jam : रायगड जिल्ह्यातील मुंबई–गोवा महामार्गावर माणगाव परिसरात आज मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी झाली आहे. महामार्गावर तब्बल चार ते पाच किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्याने प्रवासी,स्थानिक नागरिक तसेच वाहनचालकांची मोठी तारांबळ उडाली. प्रवाशांची गैरसोय झाल्याने सकाळपासूनच महामार्गावर वाहतुकीचा वेग मंदावला होता,तर काही ठिकाणी वाहतूक पूर्णपणे ठप्प झाल्याचे चित्र पाहायला मिळाले.
जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मतदारांना मतदानासाठी जाताना कोणताही अडथळा येऊ नये,यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी अवजड वाहनांवर तात्पुरती बंदी घालण्याचे आदेश दिले होते.मात्र प्रत्यक्षात या आदेशांची अंमलबजावणी होत नसल्याचे स्पष्टपणे दिसून आले. बदी असतानाही अनेक अवजड वाहने महामार्गावरून धावत असल्यामुळेच ही वाहतूक कोंडी झाल्याचं नागरिकांकडून सांगण्यात येत आहे.
प्रवाशांची प्रशासनावर तीव्र नाराजी
वाहतूक कोंडीत अडकलेल्या प्रवाशांनी प्रशासनावर नाराजी व्यक्त केली असून पोलिस आणि संबंधित यंत्रणांनी वेळीच हस्तक्षेप करून वाहतूक सुरळीत करावी अशी मागणी केली आहे. दरम्यान, या वाहतूक कोंडीमुळे मतदानासाठी जाणाऱ्या अनेक मतदारांना मतदान करण्यासाठी उशीर होण्याची भीती आहे. प्रशासनाने तातडीने परिस्थिती नियंत्रणात आणून अवजड वाहनांवर कडक कारवाई करावी आणि महामार्गावरील वाहतूक पूर्ववत करावी,अशी मागणी सर्वसामान्य नागरिकांकडून होत आहे.
नक्की वाचा >> Pune News : मतदानाच्या दिवशीच पुण्यातील रायरेश्वर किल्ल्याजवळील व्हिडीओ व्हायरल, 'त्या' 160 मतदारांनी..
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरही झाली होती वाहतूक कोंडी
मुंबई पुणे एक्स्प्रेस वेवर दोन दिवसांपूर्वी तब्बल 32 तास वाहतूक कोंडी झाली होती. या मार्गावर जवळपास 30 किमीपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. या वाहतूक कोंडीत प्रवाशांना अक्षरश:अन्न पाण्याविना रात्र काढावी लागली. पोलिसांनी काही प्रवाशांना पिण्याच्या पाण्याची आणि अन्नाची उपलब्धता करून दिली. परंतु, काही जण अन्न पाण्याच्या शोधातच राहिले.