Pune News: पुणे-नाशिक महामार्गावर 'या' ठिकाणी मोठी वाहतूक कोंडी, 4 किमीपर्यंत वाहनांच्या रांगाच रांगा, Video

पुणे-नाशिक महामार्गावर चाकण ते राजगुरुनगर दरम्यान पुन्हा एकदा मोठी वाहतूक कोंडी झाल्याचं पाहायला मिळत आहे. वाहतूक कोंडीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
Pune Nashik Highway Traffic Video Viral
पुणे:

अविनाश पवार, प्रतिनिधी

Pune-Nashik Road Traffic Video : पुणे-नाशिक महामार्गावर चाकण ते राजगुरुनगर दरम्यान पुन्हा एकदा मोठी वाहतूक कोंडी झाल्याचं पाहायला मिळत आहे. शिरोली फाट्याजवळ जवळपास चार किलोमीटरपर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याने प्रवाशांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. भर दुपारच्या उन्हात वाहनांमध्ये अडकून पडलेल्या प्रवाशांचे हाल होत असल्याचे दिसून येत आहे. सध्या लग्नसराईचा हंगाम सुरू असल्याने पुणे आणि मुंबई येथून ग्रामीण भागाकडे जाणाऱ्या नागरिकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे पुणे–नाशिक महामार्गावर वाहतुकीचा ताण वाढला असून चाकण ते खेड दरम्यान असलेल्या शिरोली फाट्याजवळ मोठी कोंडी निर्माण झाली आहे. 

या ठिकाणी दोन ते चार किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. चाकण परिसरात वाहतूक कोंडी ही नवी बाब नाही.औद्योगिक क्षेत्र,वाढती वाहनसंख्या आणि महामार्गावरील वाढलेली वाहतूक यामुळे या भागात वारंवार कोंडी होत असल्याचे दिसून येते. मात्र, आता ही समस्या राजगुरुनगर परिसरातही वाढू लागली आहे. त्यामुळे पुणे–नाशिक मार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनचालकांना अनेकदा तासंतास वाहतूक कोंडीत अडकून राहावं लागत आहे.  

Advertisement

चाकण औद्योगिक परिसरात वाहतूक कोंडीची समस्या गंभीर

स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार,या मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना आता पुण्याहून नाशिककडे निघताना चाकण ते राजगुरुनगर दरम्यान वाहतूक कोंडी आहे का याची आधी माहिती घेणे भाग पडत आहे.या सततच्या कोंडीचा परिणाम केवळ प्रवाशांवरच नव्हे तर स्थानिक अर्थकारणावरही होत असल्याचे सांगितले जाते. चाकण औद्योगिक परिसरात वाहतूक कोंडीची समस्या गंभीर बनल्याने काही उद्योगांनाही त्याचा फटका बसला आहे. वाहतुकीतील अडथळ्यांमुळे उत्पादन व वाहतूक व्यवस्थेवर परिणाम होत असल्याने काही कंपन्यांनी येथेून स्थलांतर करण्याचा निर्णय घेतल्याचेही स्थानिकांकडून सांगितले जाते.

दरम्यान,या वाहतूक कोंडीवर उपाययोजना करण्यासाठी प्रशासनाने यापूर्वी काही प्रयत्न केले होते.मात्र अद्याप ठोस तोडगा न निघाल्याने स्थानिक नागरिक तसेच या मार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनचालकांना दररोजच्या कोंडीचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे या समस्येवर तातडीने कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी पुन्हा एकदा जोर धरू लागली आहे.