Pune News: लग्न ही केवळ दोन कुटुंबांची गाठ नसते, तर ती दोन व्यक्तींच्या स्वप्नांची आणि सहजीवनाची सुरुवात असते. मात्र, लग्नानंतरही जर पती-पत्नीमध्ये शारीरिक जवळीक निर्माण झाली नाही, तर त्या नात्याचा पायाच डळमळीत होतो. पुण्यातील एका उच्चशिक्षित जोडप्याच्या बाबतीत नेमका असाच प्रकार समोर आला आहे.
लग्नानंतर पतीने शारीरिक संबंधांना वारंवार टाळाटाळ केल्याने विवाहाचे अस्तित्वच धोक्यात आले होते. अखेर पत्नीने या प्रकरणी न्यायालयात धाव घेतली आणि दोन्ही बाजूंच्या संमतीने एका महत्त्वाच्या निर्णयाद्वारे या विवाहाचा शेवट झाला.
पुण्यातील कौटुंबिक न्यायालयाने या प्रकरणात पतीची लेखी कबुली विचारात घेऊन विवाह रद्द करण्याचा ऐतिहासिक निर्णय दिला आहे. विशेष विवाह कायदा 1954 च्या तरतुदींनुसार, विवाहाचा उपभोग घेता आला नाही किंवा शारीरिक संबंध प्रस्थापित झाले नाहीत, तर असा विवाह रद्द करण्याची कायदेशीर तरतूद आहे. याच आधारावर न्यायाधीश बी. डी. कदम यांनी पीडित पत्नीला मोठा दिलासा दिला आहे.
काय आहे प्रकरण?
या प्रकरणातील पती आणि पत्नी दोघेही उच्चशिक्षित आहेत. नातेवाईकांच्या मध्यस्थीने त्यांचे लग्न ठरले आणि मोठ्या उत्साहात त्यांचा विवाह सोहळा पार पडला. लग्नानंतर सुखी संसाराची स्वप्ने घेऊन पत्नी सासरी गेली, मात्र काही दिवसांतच तिला धक्कादायक अनुभवाचा सामना करावा लागला.
पतीने शारीरिक संबंध ठेवण्याबाबत वारंवार टाळाटाळ करण्यास सुरुवात केली. पत्नीने अनेकदा संवाद साधण्याचा आणि प्रयत्न करण्याचा प्रयत्न केला, परंतु पतीच्या वर्तनात कोणताही बदल झाला नाही. अखेर हा संसार पुढे जाणे शक्य नसल्याचे लक्षात आल्यावर पत्नीने माहेरी परतण्याचा निर्णय घेतला.
( नक्की वाचा : Shocking News: 20 फेब्रुवारीपासून बेपत्ता असलेला बाप सापडला ड्रममध्ये; मुलाच्या 'त्या' कृतीने पोलिसही सुन्न )
पतीची लेखी कबुली आणि ...
आपल्या हक्कांसाठी पत्नीने पुण्यातील कौटुंबिक न्यायालयात विवाह रद्द करण्यासाठी अर्ज दाखल केला. न्यायालयीन प्रक्रियेदरम्यान एक महत्त्वाचे वळण आले, जेव्हा पतीने स्वतःहून लेखी जबाब सादर केला. या जबाबात त्याने स्पष्टपणे कबूल केले की, त्यांच्यामध्ये कोणतेही शारीरिक संबंध प्रस्थापित झालेले नाहीत.
दोन्ही बाजूंनी तथ्यांवर कोणताही वाद नसल्याचे स्पष्ट झाल्यावर न्यायालयाने वेळ न घालवता निर्णय दिला. पतीची ही बिनशर्त कबुलीच या प्रकरणात सर्वात मोठा पुरावा ठरली, ज्यामुळे साक्षीदारांची उलटतपासणी किंवा दीर्घ सुनावणीची गरज उरली नाही.
( नक्की वाचा : Pune News : वेटर ते आंतरराष्ट्रीय तस्कर, बुधवार पेठेतील महिलांच्या नशिबाशी खेळणाऱ्या बाबू भैय्याचं गुपित उघड )
या निकालाबाबत माहिती देताना पत्नीचे वकील ॲड. धनंजय जोशी यांनी सांगितले की, जेव्हा प्रतिवादी स्वतःहून लेखी कबुली देतो आणि प्रकरणातील तथ्ये स्पष्ट असतात, तेव्हा औपचारिक सुनावणीत वेळ घालवण्याची आवश्यकता नसते. अशा परिस्थितीत न्यायालय जबाबाच्या आधारे त्वरित निर्णय घेऊ शकते. यामुळे पक्षकारांना मानसिक त्रासातून लवकर सुटका मिळते आणि न्यायालयाचा मौल्यवान वेळही वाचतो. या प्रकरणात देखील प्रक्रिया संक्षिप्त ठेवून न्यायालयाने थेट आदेश दिला, जो अशा प्रकरणांतील पीडितांसाठी एक दिशादर्शक ठरू शकतो.