Mumbai News: भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी दादर येथे पोहोचण्यासाठी देशभरातून येणाऱ्या अनुयायांची गैरसोय टाळण्यासाठी दरवर्षी सोय केली जाते. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराने प्रेरित झालेल्या अनुयायांचा प्रवास सुखकर व्हावा यासाठी विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांनी थेट केंद्रीत रेल्वे मंत्र्यांना पत्र लिहिलं आहे.
आंबेडकरी अनुयायांची प्रवासाची गैरसोय होऊ नये यासाठी 6 डिसेंबर महापरिनिर्वाण दिनाच्या 5 दिवस आधी येणाऱ्या आणि 6 डिसेंबरनंतर 5 दिवसांनी मुंबईतून जाणाऱ्या रेल्वे गाड्यांना अतिरिक्त कोच जोडण्याची व्यवस्था करावी अशी विनंती विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांनी थेट केंद्रीत रेल्वे मंत्र्यांकडे केली आहे. उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांनी केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांना पत्र पाठवत ही विनंती केली आहे.
(नक्की वाचा- Maharashtra Politics: महाविकास आघाडीत फूट पडणार? काँग्रेसचा मनसेसोबत जाण्यास नकार)
भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी 6 डिसेंबरला येणाऱ्या लाखो अनुयायांमुळे मुंबईत रेल्वेवरील वाढता ताण लक्षात घेता मुंबईत दाखल होणाऱ्या रेल्वे सेवांमध्ये अधिक वाढ करण्याची गरज आहे. लोकांची प्रचंड गर्दी पाहता ये-जा करण्यासाठी रेल्वे प्रवासाच्या मागणीत लक्षणीय वाढ झाली आहे, असे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांनी रेल्वे मंत्र्यांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे.
देशभरातील अनुयायी डॉ. बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी महापरिनिर्वाण दिनाच्या आधीच मुंबईत दाखल झाला तर मुंबईतील लोकल सेवेवरील भार कमी होईल, प्रवासाची गैरसोय होणार नाही. गर्दी न करता महापरिनिर्वाण दिनाच्या नंतर या अनुयांना सुखरुप प्रवास करता येणे शक्य होईल असे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे म्हणालेत.